दिमाखदार विवाह सोहळ्यातून 35 जोडप्यांचे शुभमंगल !

0
1239

संगमनेर, प्रतिनिधी- प्रवेशद्वारापासून विवाह सोहळ्याच्या मंचापर्यंत आकर्षक सजावट.. आलेल्या प्रत्येक पाहुणे मंडळीचे अगत्याने स्वागत.. जवळपास सात हजार पाहुणे मंडळींच्या भोजनाची नियोजनबद्ध व्यवस्था. पाहुण्यांच्या करमणूकीसाठी संगीत मैफील आणि हजारों उपस्थितांच्या साक्षीने साजरा झालेला 35 जोडप्यांचा दिमाखदार विवाह सोहळा. मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या प्रत्येक क्षणाचा वधु-वरांसह उपस्थित पाहुणे मंडळींनी मनमुराद आनंद लुटला. नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, नीलम खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ.जयश्री थोरात आदी निमंत्रितांसह मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या ललितादेवी व सुवर्णा मालपाणी, उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांच्यासह डॉ.संजय, गिरीश, हर्ष, अनुराधा, रचना, सुनिता व इशिता मालपाणी आदी उपस्थित होते.

यावेळी शुभाशीर्वाद देतांना डॉ.तांबे यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा अव्याहत ठेवल्याबद्दल मालपाणी परिवाराचे कौतुक केले. अतिशय परिपूर्ण पद्धतीने संपूर्ण व्यवस्था केली गेल्याने हा सोहळा दिमाखदार झाल्याचे ते म्हणाले. आजच्या युगात एखादी परंपरा अखंडपणे सुरु ठेवणे खूप अवघड आहे, मात्र मालपाणी परिवार आपल्या दातृत्वातून गेली 28 वर्ष ही परंपरा जोपासत आहे. त्यातून मालपाणी परिवार आणि समाजसेवा ही सूत्र अधिक दृढ झाले आहे. या सोहळ्या निमित्ताने प्रत्येक नवदाम्पत्याला फुलझाडाचे रोप देवून मालपाणी परिवाराने पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिल्याचेही डॉ.तांबे यांनी यावेळी सांगितले. आमदार अमोल खताळ यांच्यावतीने उपस्थित असलेल्या नीलम खताळ यांनी मुलीच्या जन्मापासूनच तिच्या पालकांना लग्नाची चिंता लागत असल्याचा उल्लेख केला. मात्र संगमनेर त्याला अपवाद असून मालपाणी परिवाराच्या सामुदायिक विवाह सोहळ्यातून अशा पालकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रत्येक नवदाम्पत्याला रोपटं भेट देण्याची संकल्पना अतिशय स्तुत्य असल्याचे सांगताना त्यांनी या माध्यमातून नवविवाहितांनी आपल्या संसारासोबतच आपल्या घराचे आंगण आणि आपले गांवही फुलवावे असा संदेशही त्यांनी दिला. एकवीरा फौंडेशनच्या संस्थापक डॉ.जयश्री थोरात यांनी अतिशय सुंदर नियोजन अशा शब्दात वर्णन करताना या सोहळ्याचे कौतुक केले. आपले सामाजिक दायित्त्व ओळखून गेली 28 वर्ष अव्याहत सुरु असलेल्या या परंपरेतून शेतकरी, कामगार व गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचा विचार रुजत असल्याचे त्या म्हणाल्या. विविध जाती-धर्माच्या वधु-वरांचे त्यांच्या विधी-परंपरांनुसार होणार्‍या या लग्न सोहळ्यातून आपण सर्व एक आहोत असा संदेश दिला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.संजय मालपाणी यांनी आपल्या प्रास्तविकात सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वधू मालपाणी परिवाराच्या कन्या असल्याचे भावोद्गार व्यक्त केले.

अगदी सुरुवातीला उद्योग समूहातील कामगारांच्या पाल्यांसाठी होणारा हा सोहळा काही वर्षातच सर्वांसाठी खुला झाला. गेल्या 27 वर्षात 663 विवाहांच्या माध्यमातून साडेतेराशे परिवारांना एकमेकांच्या स्नेहात गुंफण्याचे सौभाग्य मालपाणी परिवाराला मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. यावर्षीच्या विवाह सोहळ्यात 31 हिंदू आणि चार बौद्ध धर्मियांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या सोहळ्यात सहभागी झालेली चौदा जोडपी पदवीधर असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भाऊ जाखडी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 31 हिंदू धर्मियांच्या तर, अहिल्यानगरचे बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांनी चार बौद्ध विवाहांचा विधी पूर्ण केला. या सोहळ्यासाठी मालपाणी लॉन्सचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. आलेल्या प्रत्येक पाहुणे मंडळीचे अगत्याने स्वागत केले जात होते. सुमारे सात हजार पाहुणे मंडळींच्या मिष्टान्न भोजनाची नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी खास संगीत मैफीलही आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक वधुवरास झाडाचे एक रोप व नववधुंना माहेरची साडी भेट देण्यात आली. विवाहानंतर प्रत्येक जोडप्यास 25 हजार रुपयांची संसारोपयोगी वस्तूंची भेटही उद्योग समूहाकडून दिली गेली. राम पाटसकर व मुरारी देशपांडे यांनी सूत्रसंचलन तर, गिरीश मालपाणी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here