प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वसले होते अचानक नगर
मुळात कोणतेही अतिक्रमण एका दिवसात किंवा अचनाक होत नसते. अतिक्रमण होत असतांना संबंधीत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणा त्याला कारणीभूत असतो. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरीकांची हिम्मत वाढून ते अतिक्रमण वाढवित असतात. त्यासाठी ते प्रचंड पैसाही खर्च करीत असतात. हा वर्ग शक्यतो गरीब व मजुरी करणारा असतो. परंतू अचानक फर्मान निघते आणि त्यांच्या निवार्यासोबतच रोजी – रोटीवर निर्दयीपणे बुलडोझर फिरवला जातो. यालाही प्रशासनाच जबाबदार असते.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरालगत असणार्या रस्ता प्रजिमा -21, म्हाळुंगी नंदीवरील पुल ते राजापूर रस्ता या रस्त्याच्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणावर नागरीकांनी अतिक्रमण केले होते. कच्चा घरांसह अनेक व्यावसाय या भागात थाटण्यात आले होते. त्यामुळे सदर पुल व परिसरात वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्याचबरोब म्हाळुंगी नदीपात्रालगत झालेल्या अतिक्रमाणामुळे नदीच्या नैसर्गिक पात्रात बदल होत होता. त्यामुळे संबंधीत अतिक्रमण धारकांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. त्यानुसार आज अखेर जेसीबी, बुलडोझरच्या सहाय्याने हे अनाधिकृत अतिक्रमण हटविण्यात आले.
म्हाळूंगी नदी व पुल गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता. अधीच प्रचंड प्रदूषणाने ही नदी दुषित झालेली असतांना ती अतिक्रमणामुळे अधिकच विदृप दिसत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 डिसेंबर 2023 रोजी संबंधीत अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवून सदर अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते. मात्र या नोटीसीला या अतिक्रमणधारकांनी केराची टोपली दाखविल्याने आज ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, संगमनेर नगरपालीकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांची टिम नगरपालीकेचे अतिक्रमण हटाव यंत्रणा अशा प्रचंड फौज फाट्यासह अकोले रोड ते राजापूर रस्ता येथील दोन्ही बाजूकडील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारकांनी मोठा विरोध केला. मात्र हा विरोध झुगारून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले.