निवडणूकीचा व्याप, उन्हाचा ताप आणि जनतेचा संताप

0
1788

नागरीकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – निवडणूका लोकशाहीतील उत्सव आहे असे म्हटले जाते. निवडणूकांद्वारे जनशक्ती प्रभाव सिद्ध करण्याचे घटनेनी दिलेली फार मोठी संधी असते. भारतासारख्या खंडप्राय देशात लोकसभेची निवडणूक ही फार मोठी जबाबदारी असून संपूर्ण देश लोकसभा निवडणूकीने ढवळून निघतो. अनेक पक्ष, अनेक गट आणि मतदार यांच्या संपर्काचा हा उत्सव साजरा करतांना उमेदवारांसह त्यांचे पक्ष आणि कार्यकर्त्यांचा पुर्ण कस लागतो. निवडणूकीद्वारे केंद्रीय राज्यसत्ता स्थापित करण्यासाठी प्रचंड मोठी चुरस, शाब्दिक स्पर्धा व यंत्रणेचा वापर होत असतो. राष्ट्रीय पक्ष निवडणूकीनिमित्त जाहीरनामे प्रसिद्ध करतात. जाहीरनाम्याद्वारे देशाच्या प्रगतीचा, जनतेच्या विकासाचा आणि स्वत: शक्तीमान असल्याचा देखावा केला जातो. मात्र जाहीर नाम्यातील सर्वच आश्वासने कृतीमध्ये येतात असे नाही. निवडणून येण्यासाठी काही उमेदवार मतदारांना प्रलोभने दाखवून अंकित करीत असतात. निवडून आल्यानंतर मात्र अनेकांना जाहीरनाम्यातील आश्वासनांचा विसर पडतो आणि मतदारांकडेही दुर्लक्ष होेते. असे असले तरी लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी शासकीय यंत्रणा, उमेदवार आणि मतदार सज्ज झालेले असतात.
2024 च्या निवडणूकीत महायुती विरूद्ध महाआघाडी असे स्वरूप दिसत असले तरी अनेक प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवार त्यांचा प्रभाव टिकवून असतात. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आसाम यासारख्या अनेक राज्यात स्थानिक आघाड्या राष्ट्रीय पक्षांच्या डोकेदुखी ठरतात. भारताचा निवडणूक आयोग संपूर्ण देशातील निवडणूकीचे नियंत्रण करतो. लाखो कर्मचारी निवडणूक यंत्रणेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. विशेषत: देशाच्या सरहद्दीवरील मतदान केंद्रे व डोंगराळ प्रदेशातील मतदार केंद्रे उभी करतांना निवडणूक यंत्रणेचा कस लागतो. विविध प्रदेशातील बदलत्या हवामानाचा सामाना करावा लागतो. असे असले तरी निवडणूक पुर्ण करण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी कोणताही त्रास सहन करून प्रयत्नशील असतात. 2024 मधील लोकसभा निवडणूक एप्रिल -मे महिन्यात असल्याने उन्हाच्या असंख्य झळा सहन करून निवडणूक पुढे जात आहे.
निवडणूकीतील उमेदवार प्रचारासाठी उन्हाची तमा न बाळगता मतदाराच्या दारात जात असतांना आश्वासनांचा पाऊस पाडतात परंतू उन्हाच्या झळा मतदारांनाही सहन कराव्या लागतात. अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. पाच वर्षातून एकदा मत माघण्यास येणार्‍या उमेदवाराविषयी काही ठिकाणी संताप व्यक्त केला जातो. असे असले तरीही लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया निरंतर चालूच राहाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here