
वृक्षप्रेमींमध्ये संताप
नगरपरिषदेच्या ‘हरित संगमनेर, सुंदर संगमनेर’ ब्रीदवाक्याला हरताळ

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजेच्या तारांना अडथळा होऊ नये, कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून संगमनेर नगरपालिका व महावितरणच्यावतीने झाडांची व फांद्याची छाटणी केली जात आहे. परंतु या छाटणीच्या नावाखाली मोठमोठ्या वृक्षांची जोरदार कत्तल देखील सुरू असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वादळी वार्यामुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी काळजी म्हणून पालिकेकडून शहरात विविध उपाययोजना सुरू आहेत. मात्र वृक्षांच्या फांद्या तोडण्याच्या नावाखाली थेट वृक्षतोड केली जात आहे. शहरातील जाणता राजा रोडवरील मालपाणी हॉस्पिटल आणि एचडीएफसी बँक समोरील 2 मोठे वृक्ष तोडण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी एचडीएफसी बँककेसमोरील मोठं झाड अशाच प्रकारे तोडण्यात आले होते. जाणता राजा मार्ग परिसरातील अनेक झाडे आतापर्यंत तोडण्यात आले आहे. संगमनेरातील नागरिक आपापल्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे कुणाचे याकडे लक्ष नाही. निसर्ग सर्वांना हवा आहे परंतु तो वाचवण्यासाठी कोणाला काहीच करायचे नाही. संगमनेर नगर परिषदेचे ब्रीदवाक्यच आहे की हरित संगमनेर, सुंदर संगमनेर. परंतु मोठमोठे वृक्ष तोडून पालिका आपल्या स्वतःच्या ब्रीदवाक्याला हरताळ फासण्याचे काम करत आहे.
संगमनेरात दरवर्षी दंडकारण्य अभियान राबवून लाखो झाडांचे वृक्षारोपन केले जाते. संगमनेर शहरात वृक्षारोपन व वृक्षसंवर्धनासाठी लाखो रूपये खर्च केले जातात. त्याचा मोठा गवगवा केला जातो. मात्र प्रत्यक्षात मोठमोठ्या झाडांची कत्तल करून नष्ट केले जात आहे. अधीच शहरात सिमेंटचे जंगल तयार होत असून त्यात झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वीजेचे पोल लावतांना आगोदरच झाडांचा अंदाज घेऊन ते उभे करण्याची गरज असते मात्र केवळ वीजेचा खांबाना अडथळा म्हणून सर्रास वृक्षतोड करणे चुकीचे आहे. रस्ते बांधणे व रस्ता रूंदीकरणासाठी मोठमोठ्या वृक्षांचा बळी दिला जात असतांना त्या ठिकाणी नविन वृक्षांची लागवड मात्र केली जात नाही. त्यामुळे अनेक मोठ-मोठे महामार्ग आज बोडके झाल्याचे दिसत आहे. वृक्षासंवर्धन करणे ही काळाची गरज आहे.






















