अतिक्रमण, अस्वच्छतेमुळे संगमनेर बसस्थानकाचा गुदमरतोय श्वास

0
1145

अवैध पार्किंग, छोटे वितरक, बेशिस्त रिक्षास्टॉप आणि बहुरूपी भिकारी ठरताहेत डोकेदुखी

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – संगमनेर बस स्थानकाचे रूप पालटल्यानंतर बसेस आणि प्रवाशांची चांगली सोय झाली. बसस्थानकालगत असणार्‍या रोडचे रूंदीकरण झाल्यामुळे प्रवाशांची आणि येथील व्यावसायिकांची चांगली सोय होईल असे वाटत असताना बेशिस्त रिक्षास्टॉप, रस्त्यावर लागणार्‍या हातगाड्या, बसस्थानक आवारात बनलेली अवैध पार्कींग, मोकाट जनावरांचा वावर, भिकारी आणि बेवारस वृध्द, नफेखोर, चोर, लुटारू यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. तर येथील अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे प्रवासी आणि येथील व्यावसायिकांचा जीव गुदमरून जात आहे. संगमनेर सारखे भव्य बसस्थानक राज्यात कुठे नसेल अशा पद्धतीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु आज याच बसस्थानकाचा जीव गुदमरून गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बसस्थानकासमोर काही दिवसांपूर्वी एकाच बाजूने रिक्षा उभ्या रहात होत्या मात्र आता रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा उभ्या असताना दिसत आहे. चारचाकी वाहन चालकांना कारण नसतानाही खूप वेळ रस्ता मोकळा होण्याची वाट पहावी लागते. त्यातच काही तरूण दुचाकी चालविताना वेगाचे भान ठेवत नाहीत, रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी न चालविता मध्येच गाडी घुसविल्यामुळे प्रौढ व्यक्ती आणि महिलांचा तोल जावून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.बसस्थानकामध्ये व्यावसायिकांना गाळे दिले असून त्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू असताना स्टॉल टाकून ठाण मांडून बसलेल्या अवैध दुकानदार गर्दीला कारणीभूत ठरत आहेत.

संगमनेरमध्ये अनेक मोबाईल आणि सिमकार्डचे अधिकृत वितरक असताना छत्रीखाली स्टॉल टाकून सिमकार्ड विकण्याचा नवा फंडा काहींनी सुरू केला आहे. ज्या जागेमध्ये गाड्या पार्किंग केल्या जाऊ शकतात त्याच जागेत ही बेकायदेशीर दुकाने असल्यामुळे चारचाकी आणि दुचाकी गाड्यांना स्क्रॅच पडण्याचे प्रमाण वाढत आहे. संगमनेरच्या ग्रामिण भागातून महाविद्यालयासाठी येणारे हजारो तरूण बसमधून प्रवास करत असतात. त्यातील काही तरूण आणि उपनगरातील व्यक्ती गुटखा खावून तेथेच थुंकतात. सिगरेटच्या धुराड्यामुळे अक्षरश: शेजारून चालणार्याला तोंडावर रूमाल लावून चालावे लागते. या तरूणांच्या गराड्यामुळे मुलींच्या छेडछाडीचे प्रमाणही वाढले आहे. तोंडातून मारलेल्या पिचकार्यांमुळे संपूर्ण बसस्थानक परिसर लालेलाल होऊन गेला आहे.

थुंकणाऱ्यांवर कारवाई करणारा बोर्ड हा नावापुरताच लावलाय की काय? असा प्रश्नही सामान्य जनतेला पडतो आहे.बसस्थानकाच्या आवारात तर सकाळीच काही प्रवासी चारचाकी आणि दुचाकी गाड्या लावून आपआपल्या कामाला निघून जातात. या अवैध केलेल्या पार्किंगमुळे बसस्थानकात चालायलाही जागा उरली नाही. काही गाड्या इतक्या दिवसांपासून उभ्या आहेत की त्यावर धुळीचे अक्षरशः थर जमा झाले आहेत. असे असतानाही प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसत आहे. बसस्थानक परिसरात ट्रॅफिक पोलिसांचे दिसणेसुध्दा दुर्मिळ आहे. वाहतूक कोंडी समस्या एवढी गंभीर असताना ट्रॅफिक पोलिस नेमके करतात काय हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. नाशिक-पुणे सारख्या शहरांमध्ये गेल्यानंतर चोविस तास आपली सेवा देणारे ट्रॅफिक पोलिस आणि अमावस्या-पौर्णिमेला उगविणारे संगमनेरचे वाहतूक पोलिस याचा विचार केला तर संगमनेरकर खरच कमनशिबी आहेत असेच वाटते. वाहतूक पोलिसांना ट्रॅफिक कंट्रोलिंगची विशेष ट्रेनिंग देण्याची गरजही आता निर्माण झाली आहे. संगमनेर बसस्थानक परिसरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे येथील भिकारी. येथील काही भिकार्यांकडे प्रचंड प्रमाणात संपत्ती आहे. नशा करायचा, पैसा कमवायचा हेच धोरण या भिकार्यांचे असून यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. मोकाट फिरणार्या जनावरांची विष्ठा, तोंडातून मारलेल्या गुटख्याची पिचकारी, बहुरूपी भिकार्यांनी केलेली घाण, प्रवाशांनी फेकलेल्या वस्तू यामुळे प्रचंड प्रमाणात घाण आणि वास सर्वत्र पसरला आहे. या बसस्थानक परिसरात मटक्याचे खेळही अवैधरित्या सुरू असून सोयिस्करित्या याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकूणच चांगले बांधकाम आणि भव्य रूप असणाऱ्या संगमनेर बसस्थानकाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर या बसस्थानकाची कचराकुंडी व्हायला वेळ लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here