युवकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा आंदोलन
संगमनेर (प्रतिनिधी):
हनुमान जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील काही हिंदुत्ववादी युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत तसेच शहरातील वाढत्या अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत संगमनेरच्या नागरिकांनी व युवकांनी एकत्र येत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. या मागण्या मान्य न झाल्यास २२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, सध्या संगमनेर शहरात मटका, जुगार, गुटखा, अवैध दारू विक्री, पत्त्याचे क्लब, वाळू तस्करी यांसारखे व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहेत. या अवैध व्यवसायांतून शहरात गुन्हेगारी व जातीय तणाव वाढत असून समाजकंटकांनी सण-उत्सवांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.
हनुमान जयंती उत्सवात दरवर्षीप्रमाणे विजय रथ मिरवणुकीस ‘हिंदुराजा ढोल पथक’कडून सलामी दिली जात होती. मात्र यावर्षी काही स्थानिकांनी राजकीय मतभेदाच्या पार्श्वभूमीवर ढोल वाजवण्यास विरोध केला. त्यातून किरकोळ वाद निर्माण झाला होता, जो काही जबाबदार नागरिकांनी तात्काळ मिटवला. तरीही नंतर काही विकृत प्रवृत्तींच्या लोकांनी या घटनेचे अतिरंजित स्वरूप रंगवून ढोल वादक व हिंदुत्ववादी युवकांवर खोटे गुन्हे दाखल केले.
विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी पोलीस अधिकारी व लोकप्रतिनिधीही उपस्थित होते, तरीही चुकीच्या आरोपांवर गुन्हे दाखल कसे झाले, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोपही करण्यात आला.
याचप्रमाणे, हनुमान जयंती उत्सवादरम्यान ललित परदेशी यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी त्यांची तक्रार स्वीकारून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर सर्वपक्षीय युवकांची उपस्थिती होती. निवेदनात जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शनिवार २२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सर्व युवकांनी एकत्र येऊन मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी अमर कतारी, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, नितिन अभंग, अमोल डुकरे, विजय पवार, विजय पांढरे आदिंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.