
संगमनेर तालुक्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मुंबईहून संगमनेरच्या दिशेने प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षावर अचानक दरड कोसळली. या नैसर्गिक अपघातात संगमनेर तालुक्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना माळशेज घाटात घडली. मृतांमध्ये एका सात वर्षांच्या बालकाचा समावेश असून, एक महिला जखमी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी माळशेज घाटातील मंदिर व बोगद्यादरम्यान ही घटना घडली.

सोयम सचिन भालेराव (वय 7) व राहुल बबन भालेराव (वय 35, दोघेही रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत. तालुक्यातील चंदनापुरी येथील भालेराव परिवार आपल्या रिक्षा क्रमांक एम एच 03 डी एस 3211 मधून मुंबईहून संगमनेरकडे येत होते. यात बबन गोपाळ भालेराव, पत्नी विमल बबन भालेराव, मुलगा सचिन बबन भालेराव, राहुल बबन भालेराव, नातू स्वयम सचिन भालेराव असे पाच जण प्रवास करीत होते. दरम्यान सायंकाळी मंगळवारी पाचच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील टोकवडे पोलीस ठाणे हद्दीत असणार्या माळशेज घाटात त्यांच्या रिक्षावर दरड कोसळली. त्यात राहुल भालेराव व चिमुकला स्वयम भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला. तर विमल बबन भालेराव यांना मार लागला. दुर्घटनेनंतर सर्वांना त्याच रिक्षातून ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोग्य अधिकार्यांनी दोघांना मृत घोषित केले. या अपघातानंतर चंदनापुरी येथे हळहळ व्यक्त होत आहे.
माळशेज घाटात पावसाळ्यात दरड कोसळून नेहमीच अपघात होत असतात. चंदनापुरी घटातील डोंगरही अनेक ठिकाणी कुमकुवत झाले असून तेथेही दरड कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.