
थोरात कारखान्याची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
संगमनेर ( प्रतिनिधी )
अनेक अडचणीवर मात करून निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. ज्यांनी कोणतेही योगदान दिले नाही ते आता फोटो काढत आहे मात्र धरण व कालवे कोणी केले हे तालुका जिल्हा व राज्यातील जनतेला माहित आहे. संगमनेर तालुक्याची राजकीय संस्कृती ही चांगली आहे. येथे भेदभाव नाही मात्र या चांगल्या वातावरणात काही मंडळी विष कालवण्याचा प्रयत्न करत असून सत्तेचा गैरवापर करून दहशत निर्माण करणार्यांचा बंदोबस्त करू असे विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब ओहोळ होते तर व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, बाजीराव पा. खेमनर, अॅड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, व्हा.चेअरमन संतोष हासे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, आर. बी. राहणे, कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिकराव यादव, मंदाताई वाघ, मीराबाई वर्पे, रामदास पा. वाघ, संभाजी वाकचौरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, निळवंडे धरण व कालवे आपण केले आहे. आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत पॅटर्न राबवताना प्रकल्पग्रस्तांना सन्मान दिला. संगमनेर तालुक्यात त्यांना जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये चांगल्या पदावर नोकर्या दिल्या. या सर्व कामात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची मदत झाली. याउलट आज जे फोटो काढत आहेत त्यांची कुठलीही मदत नाही. इंचभर जमीन त्यांनी दिली नाही. की एक मुलगा कामाला घेतला नाही. निळवंडे कोणी केले हे सर्वांना माहीत आहे चिंचोली गुरव येथील परिषदेतून दादांनी निळवंडे धरणासाठी पाठपुरावा केला धरण व कालव्यासाठी आपण अविश्रांत काम केले. आज सुदैवाने चांगला पाऊस झाला असून सर्व धरण भरले आहेत. चार रोटेशन होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. वितरिकांचे काम बाकी आहे ते आपल्यालाच करायचे आहे. निळवंडेच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देणे हे आपले ध्येय आहे. जनतेचे सातत्याने प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्यात आणि देशात आपला सन्मान होतो आहे. हे काहींना पहावत नसल्याने ते सातत्याने संगमनेर तालुक्यात विष कालवण्याचा प्रयोग करत आहेत. अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. 54 कार्यकर्त्यांवर खोट्या गुन्ह्यातून खोट्या केसेस दाखल करण्यात आले आहेत .दहशत निर्माण करू पाहत आहेत.
मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे त्यांचा बंदोबस्त आपण करू. संगमनेरच्या विकासाबरोबर त्यांची तिथली दहशत कमी करून तिथेही जनतेमध्ये आनंद निर्माण करू. आपण साडेसहा वर्ष महसूल मंत्री राहिलो कधीही कोणाची अडवणूक केली नाही. विरोधकांच्या संस्था उभ्या राहिल्या त्याच्या मंजुरी आपण दिल्या. सर्वांना बरोबर घेऊन विकास करणे ही आपली संस्कृती आहे हेच काम आपल्याला पुढे चालू ठेवायचे आहे. या सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले. या सभेसाठी सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.