सामाजिक आणि राष्ट्रसेवेत मालपाणी परिवार अग्रेसर – स्वामी गोविंददेव गिरीजी

स्वामी गोविंददेव गिरीजी


धृ्रवच्या रामायण महानाट्याने डोळ्यांचे पारणे फेडले; विविध सामाजिक संस्थाना सहा कोटींच्या देणग्या

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आपल्या अधिकारांसाठी आपण रोजच संघर्ष करतो, मात्र जेव्हा इतरांच्या अधिकारांची रक्षा हे आपल्याला कर्तव्य वाटू लागते त्यावेळी आपण विजयाच्या मार्गावर अग्रेसर होतो. मालपाणी परिवारात सामाजिक बांधिलकी व अनेक सद्गुणांचे दर्शन पदोपदी होते. या परिवाराचे नेतृत्व करणारे राजेश मालपाणी स्वाध्यायशील उद्योगपती आहेत. त्यांच्या सानिध्यातून आपलीही दृष्टी अधिक व्यापक बनली आहे. अशाप्रकारचे अनमोल रत्न लाभणे ही संगमनेर व परिसरासाठी परमेश्‍वराची मोठी देणगीच असल्याचे गौरोवोद्गार राष्ट्रसंत, श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी सोमवारी काढले.


उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्या निमित्त जाणताराजा मैदानावर आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा सोमवारी ‘रामायण’ या महानाट्यांच्या सादरीकरणाने समारोप झाला. यावेळी आशीर्वचन प्रदान करतांना स्वामीजी बोलत होते. श्रीमती सुमनताई, ललितादेवी व सुवर्णा मालपाणींसह राजेश व संगिता मालपाणी यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी स्वामीजींनी उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या जीवनचरित्रावर भाष्य करतांना त्यांची विविध गुणवैशिष्ट्ये उपस्थितांसमोर विशद केली. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात मोठ्या पगाराची नोकरी मिळत असतांनाही त्यांनी ‘जननी जन्मभूमिश्‍च स्वर्गादपि गरीयसी’ या तत्त्वानुसार मायभूमीकडे धाव घेतली. मातृभूमीच्या सेवेत आपला समर्पित भाव कसा असावा, कशाप्रकारे मायभूमीची सेवा करावी हे अनुभवायचे असेल तर मालपाणी परिवाराकडे बघावं. तन-मनं आणि धनाने या परिवाराने संगमनेर व परिसराची सेवा केल्याचे त्यांनी सांगितले. स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी नेहमी घरात प्रदीर्घ चर्चा करीत असतं.

त्यांच्या चर्चेचा विषय कधीही व्यक्तिगत नसे. ते सर्वदा परिवार आणि समाजाच्या कल्याणासह देशासाठी काय करता येईल, पुढच्या पिढीसाठी काय करता येईल यावर चिंतन करीत असतं. त्याचा परिणाम त्यांच्या चिंतनातून आणि मातोश्री ललितादेवी यांच्या संस्कारातून मालपाणी परिवारात जन्मलेल्या सगळ्याच व्यक्ती प्रतिभासंपन्न घडल्या. राजेश मालपाणी यांचे संपूर्ण जीवन भगवद्गीते मधील अंतरंग योगमय असल्याचे सांगतांना स्वामीजींनी केवळ जोरदार भाषण करता येणं, हिंमत दाखवणं अथवा हजरजवाबी असण्याने कोणी यशस्वी होत नाही तर, त्यासाठी सतत प्रसन्नता आणि सौम्यताही आपल्या ठायी असण्याची गरज व्यक्त केली.


राजकीय क्षेत्रातील नेता असो, अथवा उद्योग विश्‍वातील नेतृत्त्व या दोघांनीही सर्वप्रथम आपल्या मनावर विजय मिळवण्याची आवश्यकता असल्याचे सांगतांना स्वामीजींनी ज्याने हे साध्य केले, त्याने जीवनात यश मिळवल्याचे महाभारतातील विविध दाखल्यांसह उपस्थितांना पटवून दिले. राजेश मालपाणी यांनी सौम्यता आणि निग्रह या गुणांमूळे सगळ्यांवर विजय मिळवला आणि त्यातूनच इतक्या मोठ्या परिवाराला कोणत्याही मतभेदाशिवाय विजयाचा निरंतर मार्ग दाखवल्याचे ते म्हणाले.वेगवेगळ्या गुणांनी भरलेल्या मालपाणी परिवारातील पाचही भावंडांना पाहील्यानंतर त्या सर्वांना एका निष्ठेशी जोडून ठेवण्यासाठी महाभारतात ज्याप्रमाणे धर्मराजाने आपली भूमिका वठवली, त्याप्रमाणे राजेश मालपाणी यांची भूमिका ठळकपणे दिसून येत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. तुम्ही उत्तम नेतृत्त्व तेव्हाच करु शकता, जेव्हा तुम्ही लोकांचे सेवक म्हणून वावरत असतात यावर अधिक प्रकाश टाकतांना स्वामीजींनी महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि रामायणातील हनुमानाची भूमिका सांगतांना 1988 पासून मालपाणी उद्योग समुहातील कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला नसल्याचा दाखलाही दिला.


17 फेब्रुवारीपासून जाणताराजा मैदानावर सुरु असलेल्या या अभीष्टचिंतन सोहळ्याचा सोमवारी समारोप झाला. यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तिनशे विद्यार्थ्यांनी ‘रामायण’ हे महानाट्य सादर केले. या महानाट्यात सहभागी झालेल्या प्रत्येक पात्राने वठवलेली भूमिका, प्रत्येक भूमिकेला साजेशी वेशभूषा, नेमके संवाद, प्रकाशयोजना, पार्श्‍वसंगित आणि नेपथ्य यातून साकारलेले श्रीराम जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे विविध प्रसंग उपस्थित रसिकांना रामराज्याची अनुभूती देवून गेले. रामकथेतील प्रत्येक प्रसंगानुरुप सादर झालेल्या एकाहून एक सरस नृत्याविष्कारांनी या महानाट्याने संगमनेरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

मालपाणी परिवाराचे दातृत्त्व..
उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या एकसष्टीचे औचित्य साधून मालपाणी परिवाराने यावेळी संगमनेर-अकोले तालुक्याची शिक्षणगंगा म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिक्षण प्रसारक संस्थेत व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण सुरु करण्यासाठी दिड कोटी, आळंदी येथील वेदश्री तपोवन या संस्थेला 1 कोटी, मालपाणी उद्योग समुहाचा विस्तार असलेल्या वेगवेगळ्या 11 ठिकाणच्या शाळांसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे एकूण 2 कोटी 75 लाख, रोटरी नेत्र रुग्णालयाच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेसाठी 25 लाख व श्रीमद् भगवद्गीतेच्या प्रचार व प्रसारासाठी गीता परिवाराला 60 लाख अशी एकूण 6 कोटी 11 लाख रुपयांची देणगीही यावेळी जाहीर करण्यात आली.

आचार्य गोविंददेव गिरीजी आणि मातोश्री ललितादेवी यांनी मनोगत
व्यक्त केल्यानंतर उद्योजक राजेश मालपाणी अत्यंत भावूक झाले.
त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून उपस्थितांनाही अश्रू थांबविता आले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख