
राजापूर शिवारात आढळला बालकाचा मृतदेह
प्रेमप्रकरणातून गेला मुलाचा बळी
संगमनेर (प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यातील निरगुडसर (ता. आंबेगाव) येथून एका १२ वर्षीय मुलाचे अपहरण करुन नंतर त्याचा खून करणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. २४) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरालगत असणाऱ्या ढोलेवाडी परिसरात घडली. राजेश रोहिदास जंबुकर (रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) असे त्याचे नाव आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना व नागरिकांना दरवाजा उघडण्यासाठी वेळ लागला. तोपर्यंत त्याने अखेरचा श्वास घेतला होता. या तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून ती पोलिसांच्या हाती लागली आहे. यामधून या घटनेचा उलगडा होऊ लागला आहे.
निरगुडसर ता. आंबेगाव (जि. पुणे) येथील १२ वर्षीय आर्यन विक्रम चव्हाण या विद्यार्थ्याचे पंडीत जवाहरलाल नेहरू या विद्यालयातून आरोपी राजेश जंबुकर या तरुणाने दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण केले होते. त्यावरून पारगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून तो पसार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पारगाव पोलिसांनी यासाठी संगमनेरात तळ ठोकला, पण राजेशचा शोध लागला नाही. संगमनेर पोलिसांनी देखील त्याचा शोध घेण्यासाठी फोटो व नाव टाकून त्याची माहिती सोशल मीडियावर टाकली तरी देखील तो मिळून आला नाही.
दरम्यान, काल मंगळवारी सकाळी राजेश जंबुकर हा आपल्या घरी आला. तो कोणाशी फारसे न बोलता दुसऱ्या मजल्यावर गेला आणि घराचे दोन्ही दरवाजे बंद करून त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घराचे दरवाजे तो उघडत नसल्याने घरच्यांना संशय येऊ लागला. तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले. पोलिसांना तत्काळ कळवले असता ते घटनास्थळी आले. त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्याने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
दरम्यान राजेश याने चिठ्ठीत लिहिले आहे. की, पीडित मुलाची आई आणि त्याचे प्रेम प्रकरण होते. दोघे गेल्या काही दिवसांपासून एकत्र रहात होते. या कारणामुळे त्याची प्रेयसी आणि तिचा नवरा यांच्यात वारंवार वाद झाले होते. पीडित मुलगा हा वडिलांकडे रहात होता. त्यामुळे, मुलाच्या आईच्या सांगण्यावरून राजेशने या मुलाचे अपहरण केले होते. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा आणि मुलाचा शोध सुरू होता. राजेश हा गुन्हेगारी पार्श्वभुमीचा होता. त्याच्यावर यापुर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याच्या प्रेयसिवर देखील जीवघेणा हल्ला केला होता. पारगाव पोस्टे गुरनं – 193/2024 बी एन एस कलम 137 (2), 140 (2), 3 (5) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अपहरित बालक आर्यन विक्रम चव्हाण याचा शोध राजापुर, गुंजाळवाडी शिवारात शोध घेत असताना सायंकाळी सव्वासात चे सुमारास गुंजाळवाडी शिवारात जयवंतराव हारोजी गुंजाळ पाटिल यांचे वस्तीचे शेजारील काटनवनात पडक्या विहीरीत आर्यनचे प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत मिळुन आले आहे. या पडिक विहीरीच्या कडेला अपहरित बालकाचे शाळेचे आयकार्ड त्यावर पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक व दत्तात्रय गोविंद वळसे पाटिल माध्यमिक (कला) विद्यालय, मु. पो. निरगुडसर ता आंबेगाव जिल्हा पुणे असे असलेले मिळुन आले.