पदवीधरसाठी संगमनेर तालुक्यात ५८ टक्के मतदान ; अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंचे पारडे जड

मतदान

२ फेब्रुवारीच्या निकालाची प्रतिक्षा; शेवटच्या क्षणी विखेंची मोलाची साथ

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले असून पाच मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. तांत्रिक अडचणीमुळे काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी करता न आल्याने सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेरच्या क्षणी भाजप (विखे) ने पाठिंबा देत आपली यंत्रणा सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी कामाला लावली. त्यामुळे ही निवडून अनेक अर्थाने रंगतदार व रंजक ठरणार आहे. दरम्यान नाशिक पदवीधर मतदार संघाच्या या निवडणूकीला आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मात्र संपूर्ण तालुक्यात पसरलेल्या दाट धुक्याचा परिणामामुळे सुरूवातील संथ गतीने मतदान सुरू झाले. सकाळी दहा वाजेपर्यंत अवघे 9.50 टक्के, दुपारी 12 वाजे पर्यंत 34 टक्के तर दुपारी 4 वाजेपयर्र्ंत संगमनेर तालुक्यातील 28 मतदान केंद्रावर 58.72 टक्के मतदान झाले.


नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यासाठी शेवटच्या क्षणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजप खासदार सुजय विखे पाटील यांची यंत्रणा कामाला लागली. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली होती. भाजप पाठिंबा देणार की नाही, याबद्दल कोणतीही भूमिका तांबे आणि भाजपकडून जाहीर केली जात नव्हती. परंतु जाहीर प्रचार संपल्यानंतर भाजपने मविआला मतदान करू नका, अपक्ष उमेदवाराला मतदान करा असे म्हणत अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबे यांच्यासाठी काम करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांचे स्टेटस ठेवले. शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेत सत्यजित तांबेंच्या विजयासाठी उशीरा का होईना काम सुरू केल्याने सत्यजित तांबेंना मोठा दिलासा मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांसह विखे पाटलांच्या अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी कालपासून आपल्या मतदारांना मतदानाचे व मतदान केंद्रावर नेण्यासाठी व्यवस्था उभी केली.


पाच जिल्ह्याच्या नाशिक पदवीधर मतदार संघात एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार असून त्यात सर्वाधीक 1 लाख 15 हजार 638 मतदार अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पदवीधर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने या मतदारसंघात 338 मतदान केंद्र उभारली. यात सर्वाधिक मतदार असलेल्या संगमनेर तालुक्यात 28 मतदान केंद्र उभारण्यात आली.दुपारी मतदान संपतांना 4 वाजेपर्यंत तालुक्यातील एकूण 28 मतदान केंद्रातील 29 हजार 115 मतदारांपैकी 17095 मतदारांनी (58.72 टक्के) मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सर्वाधिक मतदान धांदरफळ बुद्रूक (79.6 टक्के) तर सर्वात कमी मतदान जि. प. शाळा शिबलापूर (41.45 टक्के ) 219 मतदान केंद्रावर झाले.

महाआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या मतदानावेळी संगमनेरला आल्या होत्या यावेळी त्या आपल्याला मतदान करावे यासाठी मतदार आवाहन करीत असतांना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी त्यांना मनाई करत हटकले. यामुळे काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. दुसरीकडे मतदान संपतेवेळी एका मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथली तांबे व महाआघाडीच्या शुभांगी पाटील यांनी एकमेकांशी चौकशी करत राजकीय मतभेद बाजूला ठेवले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख