
कार्यकर्ते उन्हाने तर मतदार दुष्काळाने त्रस्त
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आज दुसर्या टप्प्यातील मतदान होत आहे तर उर्वरित पाच टप्प्यातील मतदानासाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. तर निसर्ग देखील काही ठिकाणी आग ओकत आहे तर काही ठिकाणी अवकाळीने झोडपून काढत आहेत. दुष्काळ, पाणी टंचाई, उष्माघात यामुळे नागरीक प्रचंड त्रासले आहे. निवडणूकीचा मोसम असल्याने नेते, उमेदवार प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपात व्यस्त आहे. कार्यकर्ते उन्हातान्हात प्रचाराने त्रस्त झाले असून शेतकरी व सामान्य जनता दुष्काळाशी लढत आहे. अशी परिस्थिती सध्या सर्वत्र दिसत आहे.
देशाच्या भवितव्याची निवडणूक असतांना राजकीय पक्ष एकमेकांवर खालच्या पातळीवर टिका करत आहे. मोठ-मोठे नेते प्रचारात एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक व खालच्या पातळीवर टिका-टिप्पणी करत आहे. दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, भीषण पाणीटंचाई यासारखे अनेक प्रश्न असतांना निवडणूकीत हे प्रश्न गायब गोऊन देव-धर्म, भ्रष्टाचार, एकमेकांची उणीधुणी, फोडाफोडी, यावरच भर दिला जात आहे. मुळ प्रश्नांना बगल देऊन मोठमोठ्या सभांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले जात आहे. दुष्काळ व बेरोजगारीची परिस्थिती असल्याने सभेसाठी मतदारांना 300 ते 500 रूपये देऊन बोलवले जात आहे. सभेसाठी येणार्यांना खाण्यापिण्याची सोय देखील केली जात आहे. रोजगार नसल्याने अनेक नागरीक इच्छा नसतांना या सभांना गर्दी करत आहे. मात्र या सभेत जनतेचे प्रश्न, जनतेच्या अडीअडचणींवर, त्यांच्या समस्येंवर चर्चा न होता नको त्या प्रश्नावर चर्चा केली जात आहे.
देशाचे भवितव्य सांगणारी ही निवडणूक असतांना जनतेच्याच प्रश्नापासून ती भरकटत चालली आहे. कार्यकर्ते वैयक्तीक लाभासाठी व नेत्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या भुलथापांना बळी पडून उन्हाचा त्रास सहन करून प्रचार करत आहे. मात्र ज्याच्यासाठी हा प्रचार व ही निवडणूक सुरू आहे. त्यांचेच प्रश्न मात्र त्यातून गायब आहे. शेतकरी सध्या अनेक अडचणींना सामोरे जात असतांना राज्य कर्त्यांच्या व राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर भलतेच प्रश्न असल्याचे दिसत आहे.