पंचक्रोशीतील सर्वात मोठी राजापूरची भैरवनाथ यात्रा

0
1354

तळी भरण्याची अनोखी प्रथा

पालखी, काठी मिरवणूक आणि वाद्यांचा गजर

भैरवनाथ राजापूरचे ग्रामदैवत. आमच्या घराला अगदी खेटून असणारे भैरवनाथाचे मंदिर, दरवर्षी चैत्र वद्य नवमीला मोठी यात्रा भरते. गावातील लोकांबरोबरच पंचक्रोशीतील आठ-दहा गावाचे लोक, पाहुणेमंडळी यात्रेला यायचे. संगमनेर जवळ असल्यामुळे संगमनेरहूनही बरीच मंडळी यात्रेला येतात. पूर्वी भैरवनाथाचे मंदिर कौलारू व दुमजली होते. त्याची मध्यभागी उंची 20 फूट होती. मंदिराचे तोंड पूर्वेला होते. तर पूर्व आणि पश्चिम बाजूला उतरते छप्पर साधारणपणे 5 फूट उंचीचे होते. मंदिराच्या मध्यभागी मोठे लाकडी खांब होते. दहा फुटावर लाकडी तुळ्या होत्या. वर्षभर मंदिर रिकामेच असायचे. मंदिराच्या समोर दीपमाळ होती. त्याच्याच शेजारी मातंग समाजाचे काशी आईचे मंदिर होते. मंदिर म्हणजे एका चौथर्‍यावर दगडाचे देव शेंदूर लावून मांडलेले असायचे. आता त्या ठिकाणी छोटेसे मंदिर बांधलेले दिसून येते. काशी आई देवीच्या मंदिरासमोर एक छोटे वडाचे झाड होते, ते आता चांगलेच मोठे झालेले दिसते. लिंबाचे झाड मात्र एका वादळात पडले.
भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त प्रमुख कार्यक्रम मंदिरात तळी भरण्याचा असायचा. गावातील प्रत्येक घरामधून भैरवनाथाची तळी भरली जायची. रुमालामध्ये खोबर्‍याची वाटी घेऊन, चार जणांनी चार कोपरे धरून ती खोबर्‍याची वाटी रुमालावर वर उचलणे व भैरव नाथाचे चांगभले असे म्हणायचे.
यात्रेमध्ये लोकप्रिय तमाशाचा कार्यक्रम महत्त्वाचा असायचा. चंद्रकांत ढवळपुरीकर, कांताबाई सातारकर, काळूबाळू असे नावाजलेले तमाशा फड त्यावेळेस यात्रेला यायचे. तमाशा सुरू होण्यापूर्वी संध्याकाळी साडेसात वाजता गावातून भैरवनाथाची पालखी व काठी मिरविली जायची. काठी मिरविण्याचा मान खतोडे मंडळीला असायचा. एका उंच बांबूच्या काठीला विविध रंगाची कापडे व टोकाला मोरपीस लावलेले असायचे. वाजंत्रीच्या तालावर भैरवनाथाची उंच व जाड काठी एकट्याने नाचविणे हा एक मोठा अनुभव होता. बर्‍याच वेळेस काठी नाचवण्यावरून अनेकांमध्ये भांडणे व्हायची, रात्री साडेनऊपर्यंत काठीची मिरवणूक भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत यायची, त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व्हायची.
रात्री दहा वाजता तमाशाचा कार्यक्रम सुरू व्हायचा, भैरोबा नाथाची टेकडी व गावाची थडग्यांच्या दोन टेकड्या यामधील मोठ्या पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षक तमाशा बघण्यासाठी जमायचे, गावातील तरुण वर्ग तमाशाच्या स्टेजजवळ बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडण व लोटालोटी करायचा. त्यामुळे तमाशातील कलाकारांना योग्य प्रकारे त्यांचा कार्यक्रम सादर करता येत नाही.
गण, गवळण, रंगबाजी, वगनाट्य असे तमाशाचे परंपरागत स्वरूप असायचे. ‘राजा हरिश्चंद्र, भिल्लांची टोळी, मुंबईचा हमाल, महाराष्ट्र झुकत नाही’ असे अनेक वगनाट्य त्या काळात प्रसिद्ध होते. सकाळी सहा वाजेपर्यंत तमाशाचा कार्यक्रम चालायचा. त्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी जायचे. दुसर्‍या दिवशी सकाळी आठ ते बारा या कालावधीत तमाशाची हजेरी असायची. जे लोक रानामध्ये घर राखण्यासाठी थांबले, त्यांच्यासाठी तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम असायचा. आजही यात्रेची हजेरी हा कार्यक्रम राजापूर गावामध्ये साजरा होताना दिसतो.
यात्रेच्या दुसर्‍या दिवशी दुपारी पाच वाजता कुस्तीचा हंगामा किंवा आखाडा असायचा. महाळुंगीच्याच वाळूमध्ये गोल रिंगण करून कुस्तीचा आखाडा सुरू व्हायचा. परिसरातील समनापुर, सारोळे पठार, वडगाव, चंदनापुरी येथून नामवंत पहिलवान यायचे. त्यानंतर चार आण्यापासून शंभर रुपयांपर्यंत त्याकाळी कुस्त्या व्हायच्या. दोन तास कुस्त्यांचा आखाडा रंगायचा. शेवटी मानाची कुस्ती होऊन हंगामा संपवला जायचा.
आजही मी ज्यावेळेस राजापूरला जातो. त्यावेळेस भैरवनाथाच्या मंदिराला, हनुमान मंदिराला भेट देतो. यात्रेला गेल्यानंतर राजापूरच्या यात्रेच्या रेवड्या, गोडशेव आणल्याशिवाय माझ्या पुण्यातल्या घरी जात नाही. चैत्र महिन्याच्या वद्य नवमीला मला आजही भैरवनाथाची आठवण येते. राजापूरगावातील प्रत्येक मंदिरावर फडकणारे निशाण, चैत्र महिन्यात पिंपळाला फुटणारी पालवी, म्हाळुंगी नदीचे पात्र यांची आठवण येते.
आता राजापूर गावची मोठी प्रगती झाली आहे. मंदीराचे नूतनीकरण झालेले आहे. गावची लोकसंख्या वाढलेली आहे. आम्ही राजापूरबाहेर असणारे नागरिक राजापूरच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असतो. शक्य तेवढे सहकार्य करीत असतो. पुढेही करीत राहू. भैरवनाथ यात्रेनिमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !

  • के. पी. बैरागी सर
    माजी प्राचार्य, पुणे
    मोबाईल – 9421080104

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here