संगमनेरचा हनुमान जयंती रथोत्सव

0
888

स्वातंत्र्यपूर्व काळात संगमनेर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिले आहे. १९१७ साली लोकमान्य टिळकांनी आणि १९२१ साली महात्मा गांधींनी संगमनेरला भेट दिल्यानंतर इथल्या स्वातंत्र्य चळवळीत आणखी चैतन्य आले. रामकृष्णदास महाराज, पेटीट विद्यालयाचे मुख्याध्यापक देवीदास भास्कर लेले हे अनुक्रमे युवकांना आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळीत येण्यासाठी उद्युक्त करत होते. संगमनेरमध्ये दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी गावातून हनुमानाची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. अतिशय सुबक असा हा हनुमान रथ संगमनेरच्याच नामदेव सखाराम सुतार आणि सुंदरराव गोविंदराव मिस्त्री (खरे) यांनी तयार केला आहे. १९२७ मध्ये संगमनेरचा स्वातंत्र्यसंग्राम ऐन भरात असताना, इंग्रज सरकारने त्यावर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी गावातून रथ मिरवत न्यायचा नाही, असा आदेश काढला. १७ एप्रिल १९२७ रोजी हनुमान जयंती होती. लोकांनी सरकारचा आदेश न जुमानता रथाची मिरवणूक सुरु केली. मोठे मारुती मंदिरापासून मिरवणूक निघाली. तांदूळबाजार ओलांडून सोमेश्वर मंदिरापाशी रथ आला. पोलिसांनी त्या ठिकाणी रथ अडवला. पुढचे चार-पाच दिवस रथ एकाच जागेवर उभा होता. अखेर पोलिसांनी जराशी नमती भूमिका घेतली, आणि पाचव्या दिवशी, म्हणजे २२ एप्रिल १९२७ रोजी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात, वाजतगाजत मिरवणूक निघाली आणि नेहमीच्या रस्त्याने जाऊन मोठ्या मारुतीच्या मंदिरासमोर मिरवणूक आली.

पुढच्या वर्षी, ५ एप्रिल १९२८ रोजी हनुमान जयंती होती. उत्सवाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे पोलिसांकडे मिरवणुकीसाठी परवानगी मागितली. मात्र पोलिसांनी मिरवणुकीचा नेहमीचा मार्ग बदलून रथ न्यावा, अशी अट घातली. लोकांनी रथ नेहमीच्या मार्गाने नेऊ द्यावा, अशी विनंती केली. परंतु पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम होते. लोकही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रथाची मिरवणूक सुरु झाली. पुन्हा रंगार गल्लीतील सोमेश्वर मंदिरासमोर रथ येताच पोलिसांनी तो अडवला. मागील वर्षाप्रमाणे, येत्या काही दिवसात पोलीस रथ पुढे नेऊ द्यायला परवानगी देतील असे लोकांना वाटले. परंतु पोलिसांनी तशी परवानगी दिली नाही. दोन महिने रथ एकाच जागेवर उभा होता. दोन महिन्यानंतर अनेक अटीशर्ती घालून रथ पुढे नेण्यास परवानगी देण्यात आली. १९२९ मध्ये मात्र पोलिसांनी अतिशय कठोर भूमिका घेतली. २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती होती. तत्कालीन कलेक्टर संगमनेरला आले. त्यांनी एक बैठक बोलावली. मिरवणुकीचा मार्ग बदला, अमुक रस्त्यानेच मिरवणूक नेऊन काय फायदा आहे, तुम्ही सर्वसामान्य लोक यात पडू नका, अशा प्रकारे लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करून बघितला. परंतु संगमनेरकर आपल्या भूमिकेवर ठाम होते. लोकांनी हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी रथ नेहमीच्या जागेवर आणून ठेवला. त्या दिवशी सोमवार होता. सायंकाळी सहाच्या सुमारास डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट रावसाहेब तांबे यांनी मिरवणूक बंदीचा हुकूमनामा जाहीर केला. एव्हाना संगमनेर शहरात बाहेरून पोलीसदल दाखल व्हायला सुरुवात झाली. गावात सुमारे पाचशे पोलीस दाखल झाले. रस्त्यावर लोकांच्या झुंडीच्या झुंडी फिरू लागल्या. प्रत्येकाला उत्सुकता होती की उद्या काय होणार. त्याच दिवशी रात्री नऊ नंतर पोलिसांनी गावातल्या १४ लोकांना नोटीसा जारी केल्या.

२३ एप्रिलचा दिवस उजाडला. पहाटेपासून मारुती मंदिरात लोकांची अलोट गर्दी झाली. स्त्रिया, पुरुष, लहान मुले — अवघे संगमनेर मारुती मंदिरासमोर जमा झाले. सकाळी नऊच्या सुमारास दोन लहान मुलांच्या मदतीने रथात मारुतीची मूर्ती आणून ठेवण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी पटकन धाव घेऊन मूर्ती रथात ठेवण्यास मज्जाव केला आणि मूर्ती पुन्हा मंदिरात नेऊन ठेवण्यात आली. साडेनऊ वाजले. एप्रिलच्या उन्हाचा पारा चढायला लागला. तितक्यात स्त्रियांचा मोठा जमाव रथाजवळ आला आणि त्यांनी रथाला गराडा घातला. त्यातल्या काही स्त्रियांनी “आम्ही आमच्या जबाबदारीवर रथ पुढे नेतो. तुम्ही कृपया अडथळा आणू नका,” अशी विनंती करून बघितली. परंतु पोलिसांनी ती विनंती मान्य केली नाही. पोलिसांनी महिलांची नावे लिहून घ्यायला सुरुवात केली. तांबेसाहेब त्या ठिकाणी आले. त्यांनीही महिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला — “तुम्ही गोरगरीब बायका कशाला या फंदात पडता? गावातल्या मोठ्या घरच्या बायका घरी बसल्या आहेत… तुमचा जीव उगीच कशाला धोक्यात घालता?” अशा प्रकारे सांगून बघितले. मात्र यावर स्त्रियांनी सडेतोडपणे उत्तर दिले — “मारुती काही केवळ मोठ्यांचाच नाही. तो त्याचाही आहे आणि आमचाही आहे.” हा वाद सुरु असताना महिलाांची गर्दी वाढत गेली. त्यात गावातल्या सगळ्याच समाजाच्या स्त्रिया होत्या. तेवढ्यात पोलीस एका मुलाला हातकड्या घालून पकडून न्यायला लागले. त्याची आई आणि बहीण तिथेच उभ्या होत्या. त्या पोलिसांच्या दिशेने धावल्या आणि वाद घालू लागल्या. हा वाद सुरु होताच रथाजवळ उभे असलेले पोलीस तिकडे गेले. रथाजवळ उभ्या असलेल्या झुंबराबाई अवसक या महिलेने या संधीचा चटकन लाभ घेतला. त्या क्षणार्धात मारुतीची तसबीर घेऊन रथावर चढल्या. त्यांच्या मागोमाग आणखी पाच–सहा महिला रथावर चढल्या आणि तसबीर रथात ठेवली. आजवर मारुतीच्या रथावर पुरुषमंडळी, लहान मुले दिसायची. परंतु त्याक्षणी रथावर वाऱ्याच्या वेगाने चढलेल्या स्त्रिया आणि त्यांची ती कृती बघून उपस्थित लोक चकित झाले. रथाजवळ जमा झालेल्या सुमारे तीनशे स्त्रियांनी रथाचा दोर आपल्या हातात घेतला आणि ‘बलभीम हनुमान की जय’, ‘बजरंगबली की जय’ असा जयघोष करीत रथ ओढायला सुरुवात केली देखील. हे सगळे इतक्या वेगाने घडले की आता नेमके काय करावे हे कुणाला सुचलेच नाही. महिला वेगाने रथ ओढीत पुढे नेत होत्या. हे बघून पुरुषमंडळी चकित झाली होती. तेही घोषणा देऊ लागले. उपलब्ध माहितीनुसार यात झुंबराबाई शिंपी उर्फ अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे, पार्वतीबाई संत आणि इतर अनेक अनामिक रणरागिणींनी भाग घेतला होता.

पोलिसांनी महिला खरंच रथ ओढून नेतील याची कल्पनाच केली नव्हती, त्यामुळे त्यांनाही काय करावे हे सुचेना. पोलिसांचा रथ अडवण्याचा प्रयत्न सुरु होता. तोवर रथ संत वकिलांच्या वाड्यासमोर येऊन पोहोचला होता. पुढे भडंगबाबांची मस्जिद होती. त्या ठिकाणी पोलिसांनी काही बैलगाड्या आडव्या लावल्या. एव्हाना ही बातमी कलेक्टर साहेब आणि प्रांतसाहेबांना समजल्याने, तेही मोटारीतून रंगार गल्लीच्या दिशेने आले. त्यांची मोटारही रस्त्यात आडवी लावली. पोलिसांची एक तुकडी आडवी उभी करण्यात आली. आता रथ नक्की अडवला जाईल, अशी सर्वांची खात्री झाली होती. मात्र स्त्रिया इरेला पेटल्या होत्या. त्या रथ ओढीत वेगाने पुढे सरकत होत्या. महिलांचा जोश बघता त्या आता थांबत नाहीत, हे लक्षात येताच कलेक्टर साहेबांची गाडी पटकन बाजूला घेण्यात आली. रथ सगळे अडथळे आणि पोलिसांची भिंत बाजूला सारत पुढे सरकत होता. हातघाईच्या लढाईचा प्रसंग उद्भवल्याप्रमाणे, एकेक गोष्ट घडत होती. महिलांच्या तोंडाची मुलुखमैदान तोफ एकीकडे सुरु होती. मुठीच्या मुठी गुलाल घेऊन काही महिला समोर जो कुणी येईल त्याच्या चेहऱ्यावर फेकत होत्या. गुलाल डोळ्यात जाताच डोळे चोळीत पोलीस बाजूला सरकत होते. अधिकाऱ्यांच्या डोळ्यातही गुलाल गेला. रस्त्यात एक मोटार उभी होती. तिला जोरदार धडक देऊन रथ पुढे सरकला. पोलीस हतबल झाले होते. त्यांचा प्रतिकार थांबला. रथ साळीवाडा, नगरपालिका प्रवेशद्वार, डांबरी सडक (आताचा मेनरोड — त्याला त्याकाळी डांबरी सडक म्हणून ओळखले जायचे), सय्यदबाबा चौक, जुना मोटार अड्डा (आताचा नेहरू चौक) मार्गे पुन्हा मारुती मंदिराजवळ आला. संगमनेरात इतिहास घडला होता.

तेव्हापासून दरवर्षी हनुमान जयंतीचा रथ जागेवरून हलताना तो ओढण्याचा पहिला मान स्त्रियांना दिला जातो. ज्या पोलीस दलाने सरकारी आदेशानुसार रथाच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, त्याच पोलीस दलाचे प्रमुख (पोलीस निरीक्षक) प्रत्येकवर्षी पोलीस स्टेशनपासून आपल्या लवाजम्यासह वाजतगाजत भगवाध्वज घेऊन हनुमानरथापर्यंत येतात. त्यांच्या उपस्थितीत आरती होते आणि मग महिला रथ ओढायला सुरुवात करतात. ९२९ च्या रथ उत्सवाची आठवण सांगताना झुंबराबाई अवसक यांचे नातू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजा अवसक सांगतात, “त्यावेळी आमच्या आजीचे वय तीस–पस्तीसच्या दरम्यान होते. आजी अतिशय धाडसी. ती बाजारात लहान मुलांचे झबले, टोपडे, अंगडे असे कपडे विकायची. १९२९ च्या घटनेनंतर तिला दरवर्षी रथावर बसवले जायचे आणि मग मिरवणूक निघायची. आजी माझ्या आईला रथाच्या मिरवणुकीची आठवण सांगायची. त्यानुसार हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत गावातल्या वेगवेगळ्या तालमींचे पहिलवान मंडळी आणि त्यांचे प्रमुख भाग घ्यायचे. १९२९ रथाच्या मिरवणुकीला परवानगी मिळणार नाही हे लक्षात आल्यावर, या पहिलवान मंडळींनी महिलांना घरोघर निरोप देऊन देऊन पुढे केले होते. पोलिसांचा आणि कायद्याचा प्रचंड धाक असण्याच्या काळात, आजीने तिच्या काही सहकारी महिलांसमवेत धाडस केले — याचा सार्थ अभिमान वाटतो. तिला अनेक वर्षे रथावर बसलेली बघायचो, तेव्हा उर अभिमानाने भरून यायचा.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here