
इंदिरा महोत्सवातून महिलांना स्वयंरोजगारासाठी मोठे व्यासपीठ
महिला स्वयंपूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न- आ. थोरात
राजीव गांधी यांनी आरक्षण मांडले आणि त्यातून महिलांना विविध संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले. बचत गटात अनेक महिला भगिनी असून त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत व्हावी यासाठी रोजगार स्वयंरोजगाराची संधी देण्याची ही सुरुवात आहे एक चांगला आदर्शवत आणि समृद्ध तालुका बनून संगमनेर तालुका देशाला दिशादर्शक ठरावा यासाठी आपण सर्वजण काम करूया अशा शुभेच्छा काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाइन पद्धतीने मुंबईतून दिल्या.
इंदिरा महोत्सवात महिलांसाठी भरगच्च कार्यक्रम
इंदिरा महोत्सवात महिलांची नोंदणी करण्यात येत असून त्यांची आरोग्य तपासणी होत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील 51 कंपन्या सहभागी झाले असून अनेक महिलांना रोजगारासाठी करारबद्ध केले आहे. पॅनल डिस्कशनमधून रोजगार स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन विविध बँकांची प्रतिनिधी महिलांना कर्ज प्रकरणाबाबत मार्गदर्शन करत आहेत. चांगली सुविधा, बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था यांसह सर्व सुविधा असल्याने पंधरा हजार महिलांची मोठी उपस्थिती हे या इंदिरा महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
युवावार्ता (प्रतिनिधी)-
संगमनेर – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा समृद्ध असून महिलांना सातत्याने सन्मान मिळतो आहे. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतील इंदिरा महोत्सव हे मोठे व्यासपीठ ठरणार असून महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा हा इंदिरा महोत्सव असल्याचे गौरवोद्गार खा. प्रणिती शिंदे यांनी काढले. कारखाना कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून इंदिरा महोत्सव शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खा. भाऊसाहेब वाकचौरे, मा. आमदार डॉ, सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, आयोजक कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, शरयूताई देशमुख, प्रभावतीताई घोगरे, लिज्जत पापडचे सुरेश कोते, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, व्याख्याते गणेश शिंदे, केशव कांबळे, वंदना पाटील, मनीषा कटके, शरद नानापुरे, कुणाल दुसाने, अमित मनोरे, सतीश दवंगे, भावना बच्छाव आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, काँग्रेसने महिलांना आरक्षण दिले त्यामुळे महिलांना सर्वत्र काम करण्याची संधी मिळते आहे. तालुक्यातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालांना विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून देण्याचे काम डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे. महिला मानसिक व सक्षमीकरणासाठी आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात काम होत आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. मात्र आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महिला, चिमुकल्या सुरक्षित नाहीत. भाजपच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली असून महिलांवरील अत्याचार भ्रष्टाचार वाढले आहे. कायदे बनवले आहेत परंतु महिला पुढे येण्याचे धाडस करत नाहीत. बदलापूर घटनेनंतर पोलीस एफआयआर दाखल करून घेत नव्हते. दिल्लीमध्ये कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाची कोणी दखल घेत नाहीत. आज महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
तर खा. भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, महिलांमध्ये समाज परिवर्तनाची सर्वात मोठी ताकद असून बचत गटाची मोठी चळवळ या तालुक्यात आहे. बचत गटातील महिलांसाठी विविध केंद्रीय योजना मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू असेही ते म्हणाले. तर मा. आमदार डॉ तांबे म्हणाले, काही शक्ती पुन्हा महिलांना गुलाम बनू पाहत आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले आहे. देशाला कणखर नेतृत्व देणार्या इंदिरा गांधी होत्या त्यांच्याप्रमाणे कणखर व्हा असे आवाहनही त्यांनी केले. तर डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, दूध व्यवसायामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी आपण सातत्याने काम करत असून गृह उद्योग, रोजगार, प्रशिक्षण याचबरोबर महिलांचे आरोग्य याकरता या इंदिरा महोत्सवातून दोन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.