पोलिसांची बघ्याची भुमिका, गुन्हा दाखल करण्यासही टाळाटाळ
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – पोलीस प्रशासनाने व्यवसायिकांना रात्री दहा नंतर आपले व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अमलबजावणी करणे एका हॉटेल व्यवसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. रात्री उशिरा आलेल्या ग्राहकाला जेवण न दिल्याने त्या इसमाने जमाव बोलावून हॉटेल मालकास मारहाण करत हॉटेलची तोडफोड केली. मात्र ही घटना घडत असताना बघ्याची भुमिका घेणार्या व नंतर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्या पोलीस प्रशासनाविरूध्द मोठा संताप व्यक्त होत आहे. ही घटना काल सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शहरातील नवीन अकोले रस्त्यावरील हॉटेल सेलिब्रेशन येथे घडली. ़
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांनी व्यावसायिकांना वेळेची मर्यादा घालून दिली आहे. वेळ न पाळल्यास कारवाईचा बडगा देखील उगारला जात आहे. त्यामुळे सर्वच व्यावसायिक आपआपली आस्थापने वेळेत बंद करीत असतात. दरम्यान रात्री 10.30 च्या सुमारास हॉटेल सेलिब्रेशनमध्ये जेवणासाठी 3 ते 4 जण नशेत असताना आले होते. मात्र वेळ संपल्याने हॉटेल कर्मचार्यांनी त्यांना जेवण देण्यास असमर्थता दर्शवली.
आम्हाला कायदा सांगू नका, आम्हाला जेवण द्या असे म्हणत त्यांनी वाद घालण्यास सुरूवात केली तसेच हॉटेलमधील खुर्च्यांची फेकाफेकी सुरू केली. वाद वाढल्याने या गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी आणखी काही जणांना बोलावून घेतले. त्यांची साथ देत हॉटेलची तोडफोड सुरू केली. यावेळी त्यांनाव्विरोध करणार्या हॉटेल मालक अंकुश अभंग व त्यांच्या मुलाला या जमावाने मारहाण केली. दरम्यान यावेळी पेट्रोलिंग करणारे पोलिस वाहन सायरन वाजवत आले (त्यातही केवळ चालक होते) मात्र ते केवळ हा तमाशा पाहत बसले.
अवघ्या काही मिनीटांच्या अंतरावर असणा़र्या पोलिस स्टेशनमधून अतिरिक्त कुमक मागविले नाही किंवा हा वादही थांबविण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. हल्लेखोर पसार झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासही पोलिसांनी टाळाटाळ केली. यावरून संगमनेरची पोलिस यंत्रणा किती निष्क्रीय व तकलादू आहे याचा प्रत्यय यावेळी सर्वांना आला.