अगस्ती बंद पडला तर भविष्यात तालुक्यात साखर कारखाना सुरू होणे अवघड – गायकर

0
1976

अगस्ती कारखान्याच्या 30 व्या गळीत हंगामाचा गायकर यांच्या हस्ते शुभारंभ

अगस्ती वाचवण्यासाठी पाण्याचा लढा सर्वानी एकत्र येवून लढावा लागेल. पिंपळगाव खांड धरणाचे पाणी नेले. आता जायकवाडीला निळवंडेतून पाणी सोडावयाचा निर्णय झाला. तसेच आढळेतून पिण्याचे नावाखाली पाणी दुसर्‍या तालुक्यात नेले जात आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने अगस्तीला ऊसाचा प्रश्‍न निर्माण होईल. तेव्हा आताच सर्वानी एकत्र येवून पाण्याचा लढा द्यावा अशी भुमिका यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी व्यक्त केली.

युवावार्ता (प्रतिनिधी)
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चालु हंगाम सुरू केला असुन एफ. आर. पी पेक्षा 28 रुपये जादा दर देत 2500 रुपये टन भाव देवून एफ. आर. पी. चे 200 रु. प्रमाणे अगस्ती कारखान्याने शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. शेजारच्या कारखान्यापेक्षा थोडा भाव कमी दिला असला तरी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी वेगळा निर्णय घेऊ नये कारण अगस्ती कारखाना जर बंद पडला तर भविष्यात पुन्हा तालुक्यात कारखाना सुरु होणार नाही अशी भावना कारखान्याचे चेअरमन सीताराम पा.गायकर यांनी व्यक्त केली.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 2023-24 च्या 30 वा गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन सीताराम पा. गायकर यांचे शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी गायकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक रामनाथ बापू वाकचौरे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी विधिवत पूजन केले. याप्रसंगी सातारा येथील उद्योजक नितिन शिंदे, कारखान्याचे व्हा.चेअरमन सुनिताताई भांगरे, कॅा. कारभारी उगले, आर. पी. आय. नेते विजयराव वाकचौरे, अ‍ॅड. वसंतराव मनकर, कॅाग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, शिवसेना तालुका प्रमुख डॅा. मनोज मोरे, भाऊपाटील नवले, मारुती मेंगाळ, गिरजाजी जाधव, बाळासाहेब नाईकवाडी, प्रकाश मालुंजकर, विठ्ठलराव चासकर, मच्छिंद्र मालुंजकर, भानुदास तिकांडे, डॅा.संदिप कडलग, महेशराव नवले, बाळासाहेब नानासाहेब देशमुख, अप्पासाहेब आवारी, बाळासाहेब ताजणे, आनंदराव वाकचौ, किसनराव पोखरकर आदिसह कार्यकारी संचालक सुधिर कापडणीस व्यासपीठावर उपस्थित होते.


यावेळी गायकर पुढे म्हणाले 4 महिन्यापासून अथक परीश्रम करुन हंगाम सुरू केला आहे. जिल्हा बॅकेचे अल्पमुदत कर्ज थकल्याने मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता अनेकांनी कर्ज देवु नये म्हणूनही प्रयत्न केले. सातारा येथील उद्योजक नितिन शिंदे यांनी 18 कोटी रूपयांची इथोनॅाल पोटी मदत केली. दररोज पैसे पहायचे व प्रश्‍न सोडवायचा अशी परिस्थिती होती. माझ्यासह सर्व संचालकांनी आपल्या नावावर कर्ज काढुन जमिनी गहाण ठेवून 13 कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध झाले. त्यासाठी तालुक्यातील पतसंस्थानी मदत केली. तालुक्यातील सर्व पक्षीय मंडळीची अगस्ती कारखाना टिकला पाहिजे हि भावना आहे. कारखान्याचे कामगारांचे पगाराला 25 कोटी व 30 कोटी कर्जावरील व्याज भरावे लागते .एफ.आर.पी.पेक्षा जास्त दर दिल्याने 25 कोटीचा तोटा अगस्ती कारखान्याला झाला. चालु हंगामात 4 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले तर कमीत कमी उचललेल्या कर्जाचे व्याज तरी जाईल. भावाशी तुलना करताना तालुक्यात जर 5 लाख मे.टन ऊसाचे उत्पादन झाले तर जिल्ह्यात सर्वाधिक भाव देता येईल. .
तसेच येत्या 3 नोव्हेंबर पासून उत्पादक शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात दिवाळीसाठी साखर वाटप सुरु करण्यात येणार आहे. तरी उत्पादकानी कसलीही भीती मनात न बाळगता, सहकार्याचे भावनेने ऊस अगस्ती कारखान्यालाच द्यावा असे आवाहनही गायकर यांनी केले. यावेळी कारभारी पा.उगले, पांडुरंग नवले, मिनानाथ पांडे, प्रकाश मालुंजकर, भाऊपाटील नवले, महेश नवले, चंद्रकांत नेहे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here