संगमनेरात गटार सफाई दरम्यान विषारी गॅसने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

0
1564

संगमनेर (प्रतिनिधी) –
शहरातील कोल्हे वाडी रोड परिसरात असलेल्या नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलजवळ मुख्य गटार सफाईदरम्यान विषारी गॅसच्या संपर्कात आल्यामुळे एका स्वच्छता कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याला वाचवण्यासाठी गेलेले दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाच मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना गुरुवार, दि. 10 जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

एसटीपी ची गटार साफ करताना गॅस तयार होऊन अतुल रतन पवार वय 19 राहणार संजय गांधी नगर वडारवाडी संगमनेर हा युवक मृत्युमुखी पडला आहे त्याला काढण्यासाठी गेलेले दोन युवक देखील बेशुद्ध अवस्थेत आहेत त्यांना कुटे हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात सर्व नातेवाईक पोलिसांची चर्चा करताना व संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे

नगरपालिकेने एस टी पी प्लांटच्या पार्श्‍वभूमीवर अलीकडेच या परिसरात नव्या भूमीगत गटारे बांधली असून, सदर गटार मधोमध रस्त्यावर असल्याने नागरिक त्रस्त होते. याठिकाणी गटार तुंबल्याची तक्रार झाल्यानंतर सफाईसाठी नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना पाठवण्यात आले. जवळपास 15 ते 17 फूट खोल असलेल्या मुख्य चेंबरमध्ये एक कर्मचारी उतरला असता, आत तयार झालेल्या विषारी गॅसमुळे तो गुदमरून खाली कोसळला.
त्याला वाचवण्यासाठी दुसरा कर्मचारी खाली उतरला, परंतु तोही गॅसमुळे बेशुद्ध झाला. त्यानंतर आणखी दोन कर्मचारी मदतीसाठी उतरले, त्यापैकी एकाला श्‍वास घेणे कठीण झाले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केला. त्यानंतर पालिकेचे बचाव पथक, अग्निशमन दल, पोलिस यंत्रणा त्याचबरोबर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मदतीसाठी धावले. त्यानंतर या अडकलेल्या कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात आले.

तातडीने जखमींना संगमनेर ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षा साधने न वापरता कर्मचार्‍यांना खोल गटारात उतरवले जात आहे, ही पूर्णतः दुर्लक्षाची आणि जबाबदारी झटकण्याची वृत्ती आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here