![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/07/fe01731a-2b8d-4fab-88f0-47cd58d0a2fa-1024x682.jpg)
पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना शहर विकास आणि युवकांना रोजगार याविषयी रोखठोक मत
डॉ. तांबेंचे निलंबन सर्वात वेदनादायी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सध्या बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढत आहे, अशा परिस्थितीत सिन्नर येथील इंडिया बुल्स कंपनीच्या ताब्यात असलेली जागा सरकारने ताब्यात घ्यावी व त्याठिकाणी नवीन उद्योजकांना संधी द्यावी यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. संगमनेर औद्योगिक वसाहतीतील वीज, पाणी आणि इतर मुलभूत समस्यांबाबत आपल्याला सविस्तर माहिती देऊन मागणी केल्यास आपण निश्चित पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पदवीधर मतदारसंघांचे आ. सत्यजित तांबे यांनी दिले.
येथील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मिट द प्रेस या पत्रकार कट्यावर पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी शहर विकास आणि युवकांना रोजगार याविषयी आपले रोखठोक मत मांडले. यावेळी बोलताना आ. सत्यजित तांबे म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात आणि तांबे परिवार काँग्रेसी विचारधारेला मानणारा परिवार आहे. परंतु विधानपरिषद निवडणूकीत मोठे नाट्य घडले आणि तांबे परिवाराला काँग्रेस पासून अलिप्त व्हावे लागले. आपण पक्ष संघटना, जिल्हा परिषद या माध्यमातून समाजकारण राजकारणात आहोत. आपल्या राजकारणाचा आणि पदाचा वापर सर्वसामान्य नागरिकांना व्हावा यासाठी आपला नेहमीच प्रयत्न असतो. विधानसभेपेक्षा विधानपरिषदेचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने आपल्याला काम करण्याची अधिक संधी मिळाली आहे. परंतु संधी मिळाल्यास आपण विधानसभा नक्की लढवू असे सांगताना मतदारसंघ सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/07/999-2.png)
शहरातील प्रश्न आणि शहराचा विकास याबद्दल बोलताना आ. तांबे म्हणाले, परदेशात नदीची पुजा करण्याऐवजी नदीला तीचा हक्क कसा मिळेल आणि तिचे मूळ स्वरूप कसे कायम राहिल याची काळजी घेतली जाते. परंतु आपल्याकडे तसे होत आहे. परंतु आपण याबाबत नदी सुधार प्रकल्प योजना आखत असून शहरातून जाणार्या नदिवर एक ठिकाणी पाहण्याची जागा, कपडे धुण्यासाठीची जागा, मनोरंजन स्थळ, बोटिंग असे भाग करताना नदीचे पात्र महामार्ग पुलापासून ते सेंट मेरी स्कूल पर्यंत एकसारखे करण्याचा प्रयत्न करणार आहे.
त्याचबरोबर काही कारणास्तव बंद करावा लागलेल्या भूजल गटार योजनेत पुन्हा नव्याने काही बदल करून व आधुनिक एसटिपी प्लांट उभारून शहरातील व शेजारील गावांमधून येणार्या गटारीच्या पाण्याची विल्हेवाट करण्यात येणार आहे. संगमनेर शहरातील व बाहेर गावांवरून रोज येणार्यांची संख्या जवळपास दिड लाखाच्या पुढे आहे. परंतु त्यांच्यासाठी पुरेसे स्वच्छतागृह नाही त्यामुळे त्याची लवकर उभारणी करण्यात येणार आहे. शहरात रहदारीचा मोठा प्रश्न आहे परंतु याला नागरिकांचा बेशिस्तपणा जास्त कारणीभूत आहे. पार्किंग, शिस्त आणि अतिक्रमण या तीन गोष्टींवर काम झाल्यास शहराचा चेहरा बदलून जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/07/8888-2-1024x959.png)
सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी प्रचंड खालावली आहे. अशा परिस्थितीत आपण सध्या अपक्ष म्हणूनच बरे असे सांगते राजकारणात नेत्यांची महत्त्वकांक्षा प्रचंड वाढल्याने अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण थेट कुटुंबापर्यंत आल्याने कौटुंबिक कलह वाढले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सध्या गाजत असलेल्या आरक्षण प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, संधी पासून वंचित असलेल्या जात समूहाला आरक्षणाची गरज आहे. किमान तीन पिढ्यांना फायदा झाला तरच ते कुटुंब किंवा समाज सक्षम होतो. परंतु वारंवार एकाच कुटुंबाला आरक्षणाचा फायदा होत असेल तर त्याचाही सर्व्हे करणे गरजेचे आहे. त्यासाठी जात जनगणना करणे देखील गरजेचे असल्याचे आ. तांबे यांनी सांगितले. सध्या राज्यावर सात लाख कोटींचे कर्जे आहे त्यात आशा लोकलुभावन योजना आखून या कर्जात आणखी भर पडणार आहे. त्यासाठी महसूल वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी श्रमिक पत्रकार संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/07/99-3.png)
डॉ. तांबेंचे निलंबन सर्वात वेदनादायी
आ. बाळासाहेब थोरात यांच्या साथीने डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान दिले. आजही डॉ. तांबे स्वतः ला काँग्रेसचे सैनिक समजतात व काम करतात. परंतु विधानपरिषद निवडणुकीत रितसर मागणी करून देखील पक्षाने मला उमेदवारी नाकारली आणि डॉ. तांबे यांचे पक्षातून निलंबन केले. ही आपल्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी बाब असल्याचे आ. तांबे यांनी सांगितले. तसेच राजकारणात आपण आजही आ. थोरात यांच्या शब्दाबाहेर नाही.