
मराठी तरुण कष्टाची कामे टाळत असल्याने परप्रांतीयांची संख्या वाढली
उपाययोजनांची गरज-
शिक्षणासोबत व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षण द्यावे, जेणेकरून तरुणांना प्रत्यक्ष कामाचे महत्त्व कळेल. श्रमप्रधान व्यवसायांचे सामाजिक महत्त्व वाढवण्यासाठी प्रचार आणि प्रबोधन करणे आवश्यक आहे. तरुणांना लहान वयातच स्वावलंबी बनण्यासाठी उद्योग, स्टार्टअप आणि स्वयंरोजगार याकडे वळवणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून मजुरांची मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन राखण्यासाठी नवीन उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. शासकीय प्रयत्नांसोबतच सामाजिक स्तरावर यासाठी प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे
युवावार्ता (संजय आहिरे)
संगमनेर – देशभरात वाढत्या बेरोजगारीबाबत सातत्याने चर्चा होत असली, तरी प्रत्यक्षात अनेक उद्योगांमध्ये कुशल व अकुशल कामगारांची टंचाई भासत आहे. संगमनेर शहर आणि परिसरातही हीच परिस्थिती असून, उद्योगपती आणि व्यावसायिक कामाला माणसं मिळत नाहीत अशी तक्रार करत आहेत. त्यामुळे कामाला हात नाही, आणि हाताला काम नाही अशी विचित्र परिस्थिती संगमनेरात निर्माण झाल्याचे दिसत आहे.
कामगार टंचाईची मुख्य कारणे
शिक्षणाच्या वाढत्या संधींमुळे आणि पालकांच्या भक्कम आर्थिक पाठबळामुळे तरुणांना हलकी किंवा कष्टाची कामे करणे प्रतिष्ठेच्या प्रश्नासारखे वाटते. अनेक जण केवळ टेबलखुर्ची असलेल्या नोकर्या शोधत असतात, त्यामुळे बांधकाम क्षेत्र, हॉटेल व्यवसाय, शेती, वृत्तपत्र वितरण, स्वच्छता विभाग आणि कारखान्यांमध्ये मजुरांची कमतरता जाणवत आहे.
तसेच, मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये कष्टाची तयारी कमी झाली आहे. काही जण वेगाने पैसे कमावण्यासाठी गैरमार्गांचा अवलंब करत असल्याचेही चित्र आहे. शिवाय, सरकारच्या अनेक सबसिडी आणि अनुदानित योजनांमुळे लोकांना प्रत्यक्ष काम करण्याची गरज वाटेनाशी झाली आहे.
उद्योगपतींच्या अडचणी वाढल्या
संगमनेर आणि परिसरातील अनेक उद्योगपतींनी सांगितले की, मागील काही वर्षांपासून कामगार मिळवणे कठीण झाले आहे. मजूर जरी मिळाले, तरी त्यांच्याकडून सातत्याने काम करवून घेणे अवघड जात आहे. पूर्वीच्या तुलनेत कामगार अधिक वेतनाची मागणी करत असले, तरी कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले जात नाही. तज्ज्ञांच्या मते, कौशल्यविकासावर अधिक भर दिल्यास ही समस्या काही प्रमाणात सुटू शकते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. समाजानेही हलकी कामे प्रतिष्ठेची नसल्याचा समज मोडीत काढण्याची गरज आहे. संगमनेरातील व्यवसायिकांच्या म्हणण्यानुसार, कामगारांनी लाज न बाळगता कोणतेही काम करण्याची तयारी दाखवली, तर रोजगाराच्या असंख्य संधी त्यांच्यासाठी खुल्या होतील. मराठी तरूण शिक्षणामुळे व इतर कारणांमुळे कमी प्रतिच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने संगमनेरात देखील परप्रांतीय मजूराची संख्या झपाट्याने वाढली आहे.