विखुरलेले विरोधक केवळ थोरात द्वेषातून एकत्र

0
772

तालुक्यात एकही संस्था न उभारणारे परिवर्तनाची साद घालीत आहे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक एकाच रथाचे दोन चाके आहेत. सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी विरोधकांची असते. मग ते दिल्लीचे असो अथवा गल्लीचे. मात्र येथील विरोधक भूईछत्रासारखे निवडणुकीच्या वेळी उगवतात आणि निवडणुकीनंतर गायब होतात. तालुक्याच्या विकासात भर घालणारे एक काम, एक संस्था न उभारणारे आणि आपापल्या गटातटाचे हित सांभाळणारे विरोधक शेजारची रसद घेऊन केवळ बाळासाहेब थोरात यांना विरोध हा एककलमी कार्यक्रम राबवीत असतात. मात्र संगमनेरकरांनी त्यांचे हे उद्योग ओळखून त्यांना नेतृत्वासाठी ना कधी नगरपालिकेत संधी दिली, ना कधी सहकारी संस्थांमध्ये थारा दिला. या विखारी द्वेषाला यावेळी देखील येथील मतदार थारा देणार नाही असा विश्‍वास डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्यात मागील चाळीस वर्षांपासून बाळासाहेब थोरात यांचे एकहाती नेतृत्व आहे. याकाळात सत्तेच्या माध्यमातून अनेक योजना त्यांनी मार्गी तर लावल्या. सोबत अनेक संस्था उभारल्या. राज्यात सहकारातील अनेक संस्था डबघाईस आलेल्या असताना अपवाद वगळता येथील संस्था जोमात उभ्या आहेत. निळवंडे धरण, कालवे, रस्ते, महामार्ग, कारखाने, विविध संस्था सक्षमपणे कार्यरत आहेत. या संस्थाना संरक्षण व सामाजिक सलोखा, सहमतीने आणि विकासाचे राजकारण यामुळे येथील नागरिकांचा विश्‍वास थोरात यांनी संपादन केला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूकीत भरीव यश त्यांना मिळत गेले. महत्वाची मंत्रीपदे मिळाली आणि काँग्रेस पक्षात महत्वाचे आणि मानाचे स्थान मिळाले. आजही महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून थोरात यांच्याकडे जबाबदारी आहे. या उलट विरोधकांची परिस्थिती आहे. शेजारचे नेते काँग्रेसमध्ये असताना जो मान होता तो आज मंत्रिपद असताना देखील नाही. मात्र संगमनेर तालुक्यात जाणीवपूर्वक वर्चस्वासाठी काही अतृप्त कार्यकर्त्यांना सोबत घेऊन थोरातांना शह देण्याचा उद्योग सतत चालू आहेत.


संगमनेर तालुक्यात यापुर्वी इतके द्वेषाचे, सुडबुद्धीचे राजकारण कधीच नव्हते. विरोधक तत्वाला, विचाराला, चुकीच्या निर्णयाला विरोध करत होते. आता मात्र थोरात किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर असलेली नाराजी, आपल्याला काही मिळाले नाही म्हणून नाराजी, मान मिळाला नाही म्हणून नाराजी, सोशल मीडियावर येणार्‍या अर्धवट माहितीमुळे नाराजी यामुळे तालुक्यात नाराजांची मोठी संख्या आहे. यातील अपवाद वगळता अनेक जण थोरात द्वेषाने पछाडले आहे. प्रत्येक विरोधकांचा सावतासूभा वेगळा, गटातटात विखुरलेले मात्र लक्ष थोरातांना विरोध. त्यामुळे तालुक्यात विरोधकांना थारा मिळत नसल्याते मा.आ. डॉ. तांबे सांगतात. स्वतः विकासाचा कोणताही अजेंडा समोर ठेवत नसताना आणि उदाहरण म्हणून एक संस्था उभी करून ती मोठी केलेली नसता केवळ विरोधाला विरोध करणे हे येथील मतदारांना कधीच पटलेले दिसत नाही. संगमनेर विधानसभा निवडणुकीत यावेळी चांगलीच रंगत वाढू लागली आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी शिवसेना कमी पण पण ना. विखे यांच्या रसदवर धडाक्यात प्रचार सुरू केला आहे. मात्र त्यांचे राजकारण देखील या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचे राहिले आहे. खताळ यांचा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, भाजप असा होऊन क्षणात शिवसेनेत थंडावला. शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळाली असली तरी ते भाजपचे कमी पण विखेंचे समर्थक जास्त आहे. आजही त्यांची ओळख विखे पाटील यांचे खंदे कार्यकर्ते म्हणूनच आहे. निवडणुकीसाठी आणि विरोधाला विरोधी राजकारणासाठी, तिकीट मिळवण्यासाठी कुठलीही पक्षनिष्ठा, नैतिकता न ठेवणार्‍या उमेदवारावर विश्‍वास ठेवायचा कसा ? उमेदवाराचे नेते हे देखील विविध पक्ष बदलून फक्त सत्ता मिळेल तिकडे जाणारे असल्याने उमेदवारही तसेच वागत आहेत का ? असे विविध प्रश्‍न मतदार आता विचारत आहेत.


उद्या पराभव झाला तर खताळ खरच शिवसेनेत राहणार आहेत का? असा प्रश्‍न आता शिंदे गटालाच पडला आहे. निष्ठावंत शिवसैनिकाचे तिकीट कापून फक्त थोरातांना विरोध या एकाच निकषावर खताळ यांनी उमेदवारी मिळवली आहे. विखे पाटील यांच्या पक्ष बदलण्याचा इतिहास संपूर्ण राज्याला माहित आहे. त्यामुळे ’जसा नेता तसा कार्यकर्ता’ असा प्रकार आहे की काय ? अशी शंका सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे अश्या पक्ष बदलू व्यक्तींवर किती विश्‍वास ठेवायचा हा देखील संशोधनाचा विषय आहे. आधीचे पक्ष का सोडले याचे देखील कारण गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे 1985 चा अपवाद वगळता आ. थोरात कायम एका पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पुरोगामी विचारांवर श्रद्धा ठेवून संगमनेरच्या विकासाला चालना दिली. सततच्या कामामुळे केवळ तालुक्यात नव्हे तर देश आणि राज्य पातळीवर त्यांना सन्मान आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी संगमनेरात येतात आणि मुक्कामी राहतात यातूनच त्यांचे स्थान अधोरेखित होते. या उलट खताळ यांना जर साथ दिली तर संगमनेकरांना परावलंबी होऊन शेजारच्यांच्या वाड्यावर जाऊन आपले प्रश्‍न मांडावे लागणार आहे. संगमनेरकर सुज्ञ असून अशी परिस्थिती कधीच येऊ देणार नसल्याचे डॉ. जयश्री थोरात यांनी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here