हिंदुत्ववादी संघटनांचा जोरदार विरोध
किर्तनाच्या अडून महाराजांचा राजकीय अजेंडा – विरोधक

संगमनेर: (प्रतिनिधी)
तालुक्यातील घुलेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शनिवार, दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी महाराज संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. महाराज संग्राम बापू किर्तन करीत असताना मध्ये मध्ये राजकीय विधाने करत होते, त्यावर काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत ‘महाराज आपण अभंगावर बोला’ असे सांगितले त्यानंतर चिडलेल्या महाराजांनी विनंती करणाऱ्याला सायको म्हटले व त्यातून मोठा वाद उफाळून आला. या कार्यकर्त्यांनी थेट महाराजांच्या दिशेने चाल करून महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. तसेच किर्तन देखील बंद पाडले.
विधानसभेला झालेल्या परभावातून विरोधक अजूनही सावरलेले नाही. हिंदू किर्तनाच्या व्यासपीठावरून हिंदूत्वाची महती किंवा हिंदूत्वाचे गुणगान गाणार्या महाराजांवर माजी मंत्र्यांच्या समर्थकांनी भ्याड हल्ला केला आहे. हिंदूत्वाचे रक्षण करणार्या अशा महाराजांच्या पाठीमागे हिंदूत्ववादी संघटना खंबीरपणे उभी आहे. या हल्ल्यातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यापुढेही हिंदूत्वाच्या व्यासपीठावरून हिंदूत्वाचाच विचार मांडला जाईल. कुणाच्याही धमक्यांना व दहशतीला हिंदूत्ववादी घाबरणार नाही असा इशारा आज सोमवारी काढलेल्या मोर्चातून विरोधकांना दिला आहे.

या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. शहर पोलिस ठाण्यात या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. त्यामुळे संगमनेर शहर पोलीस स्थानकात 14 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचा निषेध करीत आज सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली. दरम्यान धार्मिकतेच्या नावावर राजकारण करून घुलेवाडी मध्ये अशांतता निर्माण करण्याचा काही प्रवृत्ती करत असून शांतता भंग करू नका असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

संगमनेर हा विकासाचा वाटेवर चालणारा तालुका आहे. मात्र राजकीय फायद्यासाठी काहीजण धर्माचा वापर करून तालुक्याची शांतता व विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहे. धार्मिक व्यासपीठावरून संत महात्मे त्यांचे विचार मांडण्याची गरज आहे. मात्र काही तथाकथित महाराज या व्यासपीठाचा वापर कुणाच्यातरी राजकीय फायद्यासाठी करीत आहेत. कालची घटना देखील अशाच वादातून झालेली आहे. संगमनेरकरांनी या घटनेचे मुळ शोधले पाहिजे. त्याचबरोबर शहराची शांतता, सामाजिक ऐक्य अबादित रहाण्यासाठी हे षड्यंत्र ओळखून प्रयत्न करावे. – बाळासाहेब थोरात
घुलेवाडी येथे शनिवारी रात्री संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. महाराज सातत्याने या कीर्तनात जातीय तेढ निर्माण होईल अशी विधाने करत होते, त्यावर उपस्थितांमधून वारंवार महाराज आपण अध्यात्मावर बोला असे सांगण्यात आले. अखेर कीर्तन ऐकणाऱ्या निलेश गायकवाड यांनी महाराज अभंगावर बोला अशी विनंती त्यांना केली, त्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गावातील ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन हा गोंधळ शांत केला, मात्र महाराजांनी अचानक प्रश्न विचारणाऱ्या गायकवाड यांना उभे करून, अभंग गाऊन दाखव असे सांगितले त्यावर गायकवाड यांनी महाराज मी श्रोता आहे असे म्हटले. मात्र त्यानंतर महाराजांनी तू सायको आहे तुझे मानसिक संतुलन बिघडलेले आहे असे विधाने करायला सुरुवात केली. त्यामुळे उपस्थित गावकऱ्यांनी उभे राहत महाराज तुम्ही अध्यात्मावर बोललं पाहिजे, असं म्हणायला सुरुवात केली, त्यानंतर गोंधळ निर्माण झाला आणि मध्येच कीर्तन थांबले. विरोधानंतर महाराज निघून गेले, वातावरण ही शांत झाले, मात्र त्यानंतर पुन्हा भंडारे महाराजांचे समर्थक असलेले काही कार्यकर्ते तिथे आले व त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. उपस्थित महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली, घोषणा देऊन, महिलांच्या अंगावर टोप्या फेकण्यात आल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला. असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

याबाबत या नागरीकांनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन दिले. त्यात पुढे म्हटले आहे की, महाराजांवर जीवघेणा हल्ला झाला, त्यांची गाडी फोडली, काचा फोडल्या अशी खोटी फिर्यादी दिली गेली आहे मात्र असे काहीही झाले नाही. कारण पोलीस संरक्षणामध्ये महाराजांना चंदनापुरी घाटापर्यंत सोडवले आहे. त्यामुळे असा कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. सोशल मीडियावर या बाबतच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहे. अशी कोणतीही घटना झाली नाही याला पोलीस प्रशासनच साक्ष आहे.
दरम्यान धार्मिक व्यासपीठावरून राजकारण करण्याची वृत्ती सध्या वाढत आहे, राजकीय अजेंडा पेरण्यासाठी अनेक मंडळी कीर्तनांचा वापर करतात त्यातून या परंपरेला मोठे गालबोट लागलेले दिसते. कायद्याचा वापर करून, खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संगमनेरात वाढलेला आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींनी यावेळी घुलेवाडीत कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली, महाराजांनी अध्यात्माचा विचार सांगायला हवा. त्यांनी राजकारणात पडू नये अशी भूमिकाही गावातील राजकारण विरहित नागरिकांनी व महिलांनी मांडली.

सोशल मीडिया चुकीच्या अफवा
घुलेवाडी मध्ये जास्तीत जास्त अशांतता निर्माण कशी होईल याकरता काही प्रवृत्तींनी महाराजांची खोटी गाडी दाखवली तिची तोडफोड झालेली दाखवली प्रत्यक्षात ही गाडी महाराजांची नव्हती. सोशल मीडियावर अशा चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असून त्यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होत आहे यामुळे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून अशा खोट्या पोस्ट टाकणाऱ्या व गैरसमज निर्माण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. यावेळी सिताराम राऊत, राजू खरात, आनंद वरपे, भास्कर पानसरे, अंकुश ताजने, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे, सोमेश्वर दिवटे, भाऊसाहेब पानसरे, मच्छिंद्र ढमाले, मनीष राक्षे यांच्यासह घुलेवाडी मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















