सहकारातील सामंजस्याचा नवा अध्याय
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – प्रवरानगर आणि संगमनेर साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होत असल्याने सहकार क्षेत्रात विखे-थोरात गटांमध्ये नव्या सामंजस्याची चाहूल लागली आहे. एकेकाळी चुरशीच्या लढतींसाठी ओळखल्या जाणार्या या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका यंदा कुठलाही संघर्ष न होता शांततेत पार पडणार आहेत. विरोधकांच्या माघारीने ही सहकार क्षेत्रातील ‘समजोता एक्स्प्रेस’ पुन्हा एकदा जोमात धावली असल्याची चर्चा कार्यक्षेत्रात रंगली आहे.
संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात विरोधकांनी निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे अंदाज चुकले. विधानसभेतील पराभवानंतर तालुक्यात निर्माण झालेले विरोधकांचे उत्साही वातावरण आणि परिवर्तनाचे दावे क्षणात फुसके ठरले.
थोरात कारखाना यावेळी पुर्ण ताकदीने लढू अशी गर्जना विरोधी नेत्यांनी केली. मात्र ऐनवेळी माघार घेतल्याने पारंपारिक विरोधक आणि ज्यांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता होती अशांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. यातील अनेकांनी भावना व्यक्त करतांना हा विश्वासघात झाल्याचे म्हंटले आहे.
विरोधकांनी दिलेल्या पत्रकात कारखान्याच्या प्रशासकीय निर्णयांवर टीका करत, सभासदांच्या मतदान अधिकारासंदर्भातील तक्रारींचा आधार घेत निवडणूक न लढविण्याचे कारण दिले असले तरी, प्रत्यक्षात उच्च पातळीवर झालेले सहमतीचे राजकारण स्पष्ट दिसते. विखे-थोरात गटांनी आंतरसमंजस्य साधत कारखान्याच्या नियंत्रणासाठी संघर्ष टाळण्याचा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. ही बिनविरोध निवडणूक म्हणजे केवळ सामंजस्य नव्हे, तर साखर कारखान्यांच्या माध्यमातून स्थानिक सहकारात स्थैर्य टिकवण्याचा एक प्रयत्नही असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
विखे आणि थोरात या दोन दिग्गज कुटुंबांनी तालुक्यातील सहकार चळवळ टिकवण्यासाठी आणि आपली पकड घट्ट ठेवण्यासाठी एकमेकांशी थेट टक्कर टाळण्याचा निर्णय घेतल्याचे यातून स्पष्ट होते. यंदाच्या निवडणुकीत विरोधकांनी सुरुवातीला आक्रमक तयारी केली होती. पॅनल जाहीर झाले, बैठका सुरू होत्या आणि तालुक्याच्या राजकीय समिकरणांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अप्रत्यक्ष समर्थनामुळे विरोधकांना बळ मिळेल असे वाटत होते. मात्र शेवटी विरोधकांच्या अचानक माघारीने सर्व समीकरणे बदलली. यामुळे संगमनेर आणि प्रवरानगर या दोन्ही कारखान्यांमध्ये साखर सहकारातील सध्याच्या सत्तास्थितीला कोणताही धोका नाही हे स्पष्ट झाले आहे. भविष्यातही विखे-थोरात यांच्यातील अशा समजुती टिकवून सहकार क्षेत्रात दीर्घकालीन स्थैर्य राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.