दुधाला चाळीस रुपये भावासाठी कोतूळ ते संगमनेर ट्रॅक्टर मोर्चा

0
1113

महामार्गावर शेण ओतून प्रशासनाला निवेदन

शेतकरी संगमनेरकरला येऊ शकतात तर लोणीला सुध्दा धडक देऊ शकतात – काॅ. अजीत नवले

दुध आणि नफा तुम्हाला आमच्या वाटेला शेण ते सुद्धा तुम्हालाच राहू द्या- संतप्त शेतकरी

युवावर्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – दुधाला ४० रुपये हमीभाव मिळावा यासाठी कोतूळ ते संगमनेर असा निघालेला शेकडो ट्रॅक्टरचा मोर्चा आज मंगळवारी दुपारी संगमनेर शहरात धडकला आणि काही वेळातच शहर ठप्प होणार असे वाटत असताना प्रशासनाने येथील शासकीय विश्रामगृहासमोर हा भव्य मोर्चा रोखला. या ठिकाणी दुध उत्पादक मोर्चेकऱ्यांनी शेण ओतून आपला निषेध नोंदवला. यावेळी शेतकरी नेते काॅ. डॉ. अजीत नवले यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत दुधाला ४० रुपये भाव देण्याची मागणी केली.


राज्यात बनावट दुध, दुध संघांची मनमानी, शासनाचे उदासीन धोरण, जनावरांच्या खाद्य कंपन्यांशी संगनमत यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. प्रचंड कष्ट करून देखील शेतकऱ्यांच्या वाट्याला शेणापेक्षा अधिक काही उरत नाही. त्यामुळे हे शेण पण तुम्हालाच राहू द्या असे सांगत काॅ. डॉ. अजीत नवले व उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करत संताप व्यक्त केला. यावेळी काॅ. डॉ. अजीत नवले यांनी शेतकरी कोतूळ येथून संगमनेरला येऊ शकतो तर तो लोणी आणि मुंबईला देखील जाऊ शकतो असा इशारा दिला.
संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारत शेतकऱ्यांच्या भावना शासना पर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले आणि या मोर्चाची सांगता झाली.
संगमनेकरांनी अनुभवला ट्रॅक्टर मोर्चा दुध दर वाढीसाठी कोतूळ ते संगमनेर असा ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे याची माहिती संगमनेरकरांना होती परंतु हा मोर्चा शहराबाहेरच अडवला जाईल असे वाटत असताना दुपारी चारच्या दरम्यान हा मोर्चा अकोले रोडवरून नवीन अकोले रोड मार्गे बसस्थानकावर आला. आणि शासकीय विश्रामगृहासमोर महामार्गावर एका रांगेत स्थिरावला. शेतकऱ्यांची मागणी, त्यांची शिस्त यामुळे संगमनेरकर भारावले आणि एक आगळावेगळा मोर्चा संगमनेरकरांना पहायला मिळाला.

प्रत्येक्षदर्शी नागरीकांची प्रतिक्रीया –

आज शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा बघितला. मन सुन्न झाले. किमान दोनशे ट्रॅक्टर मोर्च्यामध्ये सहभागी होते. शेतकऱ्यांनी हातातील काम सोडून, एकत्र येऊन कोतुळ वरून संगमनेरला आले. पावसाची तमा न बाळगता, जेवणाची फिकीर न करता हजारो शेतकरी बाहेर पडले याचे भान राज्यकर्ते ठेवणार आहेत की काही हा प्रश्न गांभीर्याचा आहे.
: शेती व दूध व्यवसाय व्यापारीदृष्ट्या अत्यंत अडचणीचा झाल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन अठरा दिवस कोतुळ येथे चालू असताना सत्ताधारी निबर कातडीचे होऊन दुर्लक्ष करतात तेव्हा ते शेतकरी विरोधी असल्याचे दिसते म्हणून शेतकरी संघर्ष मोर्चे काढतात.
आजच्या मोर्चास लागलेले डिझेल, गेलेला दिवस, अर्धपोटी राहून सरकारला जागे करण्यासाठी लढा देणारे शेतकरी एक दिवस ही जुलमी सत्ता उलथून टाकल्याशिवाय राहणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here