आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या

औद्योगीकरणाची कास धरा अथवा विनाशासाठी तयार रहा (Industrialise or Perish) ही घोषणा देऊन त्यांनी भारताला औद्योगीकरणाची दिशा दाखवणारे वटवृक्ष

भारतरत्न डॉ मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1860 साली म्हैसुर राज्यात (आताचे कर्नाटक राज्य) कोलार जिल्हयातील चिकबल्लापूर तालुक्यातील मुदेनहल्लीगावात झाला त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री हे संस्कृतचे पंडित व आयुर्वेद तज्ञ होते. त्यांच्या आईचे नांव व्यंकम्मा. सर विश्‍वेश्‍वरैय्या 15 वर्षाचे असतांना त्याचे वडील वारले. विश्‍वेश्‍वरैय्या यांनी प्राथमिक शिक्षण चिकबल्लापूर येथे पुर्ण केले. यानंतर त्यांनी बंगळुर येथील सेंट्रल महाविद्यालया मध्ये पदवी शिक्षण पुर्ण केले. मद्रास विद्यापीठातुन 1881 साली बी.ए. पास केल्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत, कॉलेज ऑफ सायन्स आताचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) येथुन 1883 साली प्रथम श्रेणीत एलसीई आणि एफसीई परीक्षा उतीर्ण केल्या. या परीक्ष आत्ताच्या बी.ई. परीक्षेच्या समकक्ष आहे.

सर मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैय्या यांचे स्थापत्य अभियांत्रिकीतील शिक्षण पूर्ण होताच ब्रिटीश सरकारच्या मुंबई इलाख्यात सहाय्यक अभियंता या पदावर रुजू करुन घेतले. त्यांची पहिली नेमणुक नाशिक धुळे परीसरात झाली. स्थापत्य अभियांत्रिकीतील अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या पूर्णत्वास नेले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्हात त्यांनी काम केले. 1904 साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली.
सिंध प्रांतातील सिंधु नदीवर सक्कर बॅरेजची निर्मीती करुन सक्कर शहराच्या पाणीपुरवठयाचा प्रश्‍न त्यांनी मार्गी लावला. अशाच प्रकारे सिंध शहराचा पाणी पुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था पुर्ण करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. म्हैसुर राज्यात कावेरी नदीवर 50 टी.एम.सी. क्षमतेचा 60 मेगॉव्हॅट जलविद्युत निर्मितीचा दीड लाख एकरापेक्षा जास्त क्षेत्राला सिंचन सुविधा देणारा त्यावेळचा सर्वात मोठा जलाशय त्यांनी निर्माण केला. कावेरी नदीवरील हे धरण कृष्णराज सागर जलाशय म्हणुन ओळखले जाते.

1938 ला गांधीजींच्या सांगण्यावरुन विश्‍वेश्‍वरय्या ओरिसा प्रांताला पुराच्या विळख्यातुन सोडविण्यासाठी त्या प्रांतात गेले. त्यांनी पुर नियंत्रण योजना बनविली. त्याचाच परीपाक म्हणुन पुढे महानदीवर देशातील सर्वत जास्त लांबीचे हिराकुंड धरण बांध्ण्यात आले. भारत देशाला समृध्द, संपन्न कसे करावे, दारीद्रय मुक्त कसे करावे, याच चिंतनात ते सतत असत. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी स्वत:च्या खजगी खर्चाने परदेश दौरे केले. पुण्याजवळील खडकवासला धरणाची उंची न वाढवता पाणी साठा वाढविण्यासाठी आणि त्याच बरोबर पुणे शहराला मुठा नदीच्या पुरापासुन दिलासा देण्यासाठी स्वयंचलित दरवाजे बसविण्याची योजना त्यांनी कार्यान्वित केली. या दरवाज्यांचे पेटंट त्यांना मिळाले. पण त्याची रॉयल्टी त्यांनी घेतली नाही. देशात आणि देशाबाहेर सांडपाणी व्यवस्था निर्माण करण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.

औद्योगीकरणाची कास धरा अथवा विनाशासाठी तयार रहा (Industrialise or Perish) ही घोषणा देऊन त्यांनी भारताला औद्योगीकरणाची दिशा दाखवुन भारताला खर्‍या अर्थाने विकासाचा एक नवीन मार्ग दाखवुन दिला. भारतातील बरेचसे उद्योग व व्यवसाय सुरु करण्याचे क्षेय त्यांना जाते. औद्योगीक प्रगती भक्कम पायावर उभारायची असेल तर पाया मजबुत असावा अशी त्यांची धारणा होती. ती मजबुत करण्यासाठी शिक्षण, लोखंड, पोलाद उद्योग, विद्युत निर्मीती, दळणवळणाच्या साधनांचा विकास, बँकांचा विकास, धरणे बांधुन जलसंचय वाढविण्याच्या योजना यावर त्यांनी विशेष भर दिले. म्हैसुर मधील पोलाद कारखान्याची निर्मिती आणि वाढ टाटांनी जवळुन पाहीली होती. अशाच प्रकारचा कारखाना टाटांनी जमशेदपुरला निर्माण केला होता. विश्‍वेश्‍वरय्या सारख एक तज्ञ प्रशासकाचा सहभाग टाटा उद्योग समुहाकडे असावा असे वाटुन टाटांनी विश्‍वेश्‍वरय्यांना संचालक पदावर घेतले.

निवृत्तीनंतर सतत 28 वर्ष सर एम.व्ही टाटा उद्योग समुहाबरोबर मार्गदर्शक या नात्याने राहीले. भद्रावती लोखंड पोलाद उद्योग, जोग जलविद्युत निर्मिती योजना, बँक ऑफ म्हैसुरची स्थापना, नॅरो गेज व मीटर गेज रेल्वे प्रकल्प, भटकल येथील बंदर विकास योजना. विमानाचा कारखाना सुरु करण्याची व पायाभुत संस्थांची उभारणी त्यांनी केली. त्यांनी निव्वळ पायाभुत औद्योगीक संस्थाच सुरु केल्या नाहीत तर म्हैसुर सॅडल सोप, रेशीम उद्योग, कागद उद्योग, हॉटेल व्यवसाय, छपाई उद्योग, चंदनाचे तेल, धातु, चामडे, साखर या सारखे उपयोग्य वस्तुंचे कारखाने स्थापुन औद्योगीकरणाला चालना दिली. उद्योग व व्यवसाय यांना चांगले स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणुन त्यांच्या संघटना स्थापण्यावर त्यांनी विशेष भर दिला. म्हैसुर चेंबर ऑफ कॉमर्स, ऑल इंडिया मॅन्युफक्चरींग ऑर्गनायजेशन या संस्थांच्या स्थापनेतही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. अर्थशास्त्रीय परिषद, सर्वदलीय परिषद, भारतीय विज्ञान कॉग्रेस या सारख्या संस्थांच्या अध्यक्षपद त्यांनी संभाळले आहे.

म्हैसुरचे दिवानपद स्विकारण्या अगोदर त्यांनी त्यांच्या सर्व नातेवाईकांस घरी जेवणास बोलाविले व त्या सर्वांना स्पष्टपणे सांगितले की हे प्रतिष्ठित दिवाणपद ते एका अटीवर स्विकारतील की, एकही नातलग त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या कार्यालयीन कामासंदर्भात शिफारशीसाठी येणार नाहीत. सन 1912 मध्ये म्हैसुरचे दिवाण म्हणुन त्यांची नेमणुक झालयानंतर कावेरी नदीच्या पाण्याचे त्यांनी सर्वक्षण केले व अमेरीकेतील तेन्सी व्हॅली अकदमीच्या मॉडेल वरुन डिझाईन केले. याचा उपयोग म्हैसुरच्या मंड्या जिल्हाला फक्त इरिगेशनसाठीच नाही तर त्यातील कारखान्यासाठी वीज निर्माण करण्यासाठी झाला. सर एम.व्ही. नी म्हैसुर विद्यापिठाची स्थापना केली. बेंगलोर मध्ये इंजिनिअरींग तसेच हेब्बल मध्ये ग्रीकल्चर कॉलेज सुरु केले. उच्च दर्जाचे तांत्रीक शिक्षण दिल्याशिवाय प्रगती होणार नाही अशी त्यांची खात्री होती. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या खर्चाने बेंगलोरला जयचामराजेंद्र वोडीयार पॉलीटेकनिक सुरु केले.

म्हैसुरचे दिवाण असतांना त्यांनी 1912-1918 या काळात कन्नड भाषेतुन शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवले, शेती शाळा काढल्या, शेतकी प्रयोग परिसर स्थापले, ग्रामीण वाचनालये उघडली. त्यांनी कन्नड साहीत्य परिषदेची स्थापना केली व विज्ञानाचा प्रसार लोकभाषेतुन व्हावा म्हणुन कन्नड भाषेतुन विज्ञानाची पुस्तके लिहुन घेऊन प्रकाशित केली. ते म्हैसुरचे दिवाण या पदावरुन सन 1918 साली स्वेच्छेने निवृत्त झाले. निवृत्तीनंतर सुध्दा ते सतत काम करत राहीले. त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने टपाल तिकीट काढले.

सर विश्‍वेश्‍वरैय्या यांनी केलेली विशेष महत्वाची कामे

1) टोमॅटिक गेटचे डिझाईन संशोधन, निर्मीती, पेटंट, त्यानंतर त्याचे स्वामित्वधन स्विकारले नाही. खडकवासला, राधानगरी, टायमरा, कृष्णराजसागर इ.ठिकाणी ही गेटस् बसविली.
2) ब्लॉक सिस्टिम पांझरा नदीवरील व फडपध्दत पाहुन, अभ्यासुन त्यावरुन ‘ब्लॉक पध्दत’ डिझाईन केली. त्याला मंजुरी मिळवून महाराष्ट्रातील पुणे जिल्हयात नीरा नदीच्या डाव्या कालव्यावर प्रथम तिची अंमलबजावणी. नंतर महाराष्ट्रात नीराबरोबरच प्रवरा व मुळा नदीवर तर म्हैसुर संस्थानात सुमारे 2500 ठिकाणी जुन्या बंधार्‍यांवर (अनिकट) तसेच नवीन बंधारे व कालव्यांवर उभारणी.
3) सायफन पध्दतीचा वापर पाणी समपातळी गाळते हा गुणधर्म पुर्वीपासुन माहीत होता. राजेरजवाडयांनी किल्ले व राजवाडे हयामध्ये हे तत्व वापरले होते. तथापी पाण्याच्या हया गुणधर्माचा वापर करुन सामान्य माणासासाठी पाणीपुरवठा (धुळे योजना) आणि शेतीच्या सिंचनासाठी पाणी (दातर्ती सायफन) येथे त्यांनी केलेला वापर हे त्यांच्या कुशाग्र बध्दिमत्ता व तंत्रज्ञानाचे फलित होते.
4) कृष्णराजसागर सिंचन उद्योगासाठी वीज व प्रचंड जलसाठा निर्माण करुन वेगवेगळया छोटया बंधार्‍यांना (अनिकटचा) वापर करुन ब्लॉक पध्दतीच्या वापरातुन जलवाटप व व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण तसेच वृंदावन गार्डन सारख्या सुंदर वास्तुची निर्मिती.
5) भद्रावती स्टील मोठया उद्योग धंदयांच्या वाटचालीतील ‘महत्वाचे पाऊल’
1955 मध्ये भारत सरकारतर्फे देशाचा सर्वच्च किताब भारतरत्न हा राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन् यांचे हस्ते सर एम.व्ही. यांना प्रदान करण्यात आला. सर एम.व्ही. यांचे 14 एप्रिल 1962 रोजी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणुन भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत 1998 पासुन त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणुन भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र्र शासनाने ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे. विश्‍वेश्‍वरय्या हे एखाद्या वटवृक्षासारखे आहेत. त्यांचा भुतकाळ व पाळेमुळे ही भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत, तर त्यांची नजर ही प्रगत संपन्न सुशिक्षीत अशा भारताचा वेध घेत आहे. त्यांच्या एकेका कार्याचे आणि कृतीचे केवळ दर्शन आणि स्मरण हेही आपल्यासाठी पवित्र आणि पुण्यदायी आहे.

इंजि. संदीप पांडागळे
कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, धुळे
इंजि. हरिभाऊ गिते, अध्यक्ष, सरळ सेवा
वर्ग 1 अभियांत्रिकी अधिकारी संघटना, महाराष्ट राज्य

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख