सजग नागरीकांमुळे टळले अपघात
संगमनेर (दैनिक युवावार्ता) संगमनेर- नाशिक पुणे महामार्ग हा अनेक शहरांना तसेच राज्यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. या महामार्गावरून पुणे, नाशिक, इंदोर, अहमदाबाद, गुजरात राज्यात माल वाहतूकीसह प्रवासी वाहतुक मोठ्या प्रमाणावर होत असते. त्याचबरोबर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असतात. अनेक वेळा अपघातात जीवीत हानी वित्तीय हाणी देखील होत असते. तर काही वेळा अपघातानंतर वाहन चालक पसार होतात. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न देखील निर्माण होतात.
अशीच गंभीर घटना आज बुधवारी पहाटे तालुक्यातील बोटा शिवारात हॉटेल कामत जवळ आढळून आली. या महामार्ग दुभाजकाला रात्री किंवा पहाटे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुभाजकाचे लोखंडी पोल तुटून रस्त्यावर आले. सदर वाहन चालक पसार झाला परंतु हे पोल अर्ध्या रस्त्यात आडवे झाले. सदर वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे भरधाव वेगाने आलेल्या वाहनांचा अंदाज चुकल्यास पुन्हा या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर वाहन चालकांच्या प्रसंगावधानामुळे काही अपघात टळले.
दरम्यान संगमने येथील रउद्योजक बाळासाहेब देशमाने यांच्या स्वदेश सेवाभावी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी दत्ता कासार हे प्रवासाच्या निमित्ताने पहाटे नाशिक पुणे महामार्गावर प्रवास करत असताना अचानकपणे रस्त्यावर आडवे पडलेले लोखंडी पत्रे त्यांना दिसले. चालक सचिन पेटकर यांच्या ही बाब लक्षात येताच वेळीच अंधारामध्ये त्यांनी गाडी थांबली. येणार्या वाहनांना बाजूला जाण्याचे विनंती करत दत्ता कासार यांनी ताबडतोब आपत्कालीन क्रमांक112 कक्षाशी संपर्क साधला व या घटनेबद्दल व परिस्थितीबद्दल माहिती दिली. तसेच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना देखील माहिती देण्यात आली. याकामी एका पत्रकाराची देखील साथ मिळाली आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुभाजकाचे तुटलेले पत्रे (पोल) पुन्हा त्या जागेवर बसवले.
दक्ष आणि सजग व्यक्तिमत्व काय करू शकतो याचे उदाहरण चालक सचिन पेटकर व दत्ता कासार यांच्या माध्यमातून आज नाशिक पुणे महामार्गावरील होणारा संभाव्य मोठा अपघात ठळला आहे. प्रत्येक नागरीकांनी आपली जबाबदारी योग्य वेळी पार पाडल्यास अनेक दुर्घटना टळू शकतात.