
निळवंडे कालव्याच्या पाण्यासाठी संगमनेरच्या शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र
सत्ताधाऱ्यांकडून फसवणूक, वस्तुस्थिती वेगळीच – शेतकऱ्यांचा आरोप
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला. या कालव्यातून तीन रोटेशन झाले. मात्र प्रत्येक वेळी संगमनेर तालुक्याला डावलण्यात आले. त्यामुळे शेतकर्यांनी कालव्यावर पाईप टाकले. हे पाईप प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता फोडल्याने शेतकरी संताप झाले. सुमारे 500 शेतकर्यांनी रात्रभर आंदोलन करून जलसंपदा विभाग व प्रशासनाला धारेवर धरले.
सध्या उन्हाळी आवर्तनातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सुरू आहे. हे पाणी संगमनेर तालुक्यातून पुढे जात असताना तालुक्याला मात्र पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत नवीन लोकप्रतिनिधींनी सर्व बांधारे भरून घेऊन असे सांगितले. वस्तुस्थिी मात्र वेगळीच आहे.
तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. मात्र सत्ता दुसर्यांची आल्याने तालुक्याला उपेक्षित ठेवले जात. तरीही तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे. ही सातत्याने मागणी सर्वजण करत असून इंद्रजीत थोरात ही रात्री अपरात्री डाव्या व उजव्या कालव्यावर चक्कर मारून शेतकर्यांना निळवंडे डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी मिळेल यासाठी काम करत असून बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मिळालेल्या पायपांमुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अधिकार्यांनी हे पाईप फोडल्याने तालुक्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
डाव्या व उजव्या कालव्यातून मागील दोन वर्षात तीन आवर्तने झाली मात्र संगमनेर तालुक्याला प्रत्येक वेळी टाळण्यात आले. याबाबत शेतकर्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला. थोरात यांनीही प्रशासनाला संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांची मागणी रास्त असून त्यांना पहिले पाणी मिळाले पाहिजे यासाठी आपण काम करावे अशा सूचना दिल्या. मात्र प्रशासन हे सत्ताधार्यांच्या दबावात आहे. त्यांनी संगमनेरला पाणी दिले नाही. हक्काचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. अशावेळी बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून उजव्या व डाव्या कालव्यावरील विविध गावांमधील शेतकर्यांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांच्या पाईप उपलब्ध करून देण्यात आले.
हे पाईप शेतकर्यांनी उजव्या व डाव्या कालव्यावर टाकून आपल्या शेतीसाठी पाणी घेतले. उजव्या कालव्यावर निमगाव खुर्द ते खळी यामधील विविध गावांमधील शेतकर्यांनी पाईपद्वारे पाणी उचलले तर डाव्या कालवे हे पिंपळगाव कोंझिरा ते लोहारे येथील कदम वस्ती या संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांनी पाईप द्वारे पाणी उचलले.