संगमनेरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पोलीसांकडून जेरबंद

0
75

युवावार्ता (प्रतिनिधी)

संगमनेर – शहरालगत सावजी हॉटेल समोरील नाशिक-पुणे महामार्गावरील बोगद्यात दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या टोळीचा पर्दाफाश संगमनेर पोलिसांनी केला. बुधवारी पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसल्याने कारवाई करत दोन जणांना अटक केली, तर चौघेजण अंधाराचा फायदा घेत फरार झाले. बुधवारी पहाटे एक वाजता पोलिस पेट्रोलिंग करत असताना बोगद्यात काही व्यक्ती दबा धरून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्या जवळ तलवार, कोयते, फायटरसारखी घातक शस्त्रे, लोखंडी पक्कड, मोबाईल आणि स्प्लेंडर दुचाकी आढळून आली.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रोहन अनिल अभंग (२७, रा. देवाचा मळा) व सोनू ऊर्फ अर्थव संतोष दुधाने (१९, रा. देवाचा मळा) यांना अटक केली. दरम्यान, प्रेम वाल्हेकर, अजय विजय वाल्हेकर (दोघे रा. गुंजाळवाडी) व अश्फाक शेख (रा. अकोले नाका) हे चौघे फरार झाले. या प्रकरणी पोलीस शिपाई सुभाष बाळू मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ४६६/२०२५ नुसार भा.दं.वि. कलम ३१०(४), ३१०(५) सह शस्त्र अधिनियम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, डॉ कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, रविंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली समिर अभंग, पोलीस उपनिरीक्षक, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, पोना राहुल कचरु डोके, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर कार्यालय, पोकों राहुल कैलास सारबंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर कार्यालय, पोकॉ सुरेश बाळु मोरे, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, पोकॉ विजय तबाजी आगलावे, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, पोकॉ शशीकांत तुकाराम दाभाडे, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, पोकॉ रोहीदास धर्मनाथ शिरसाठ, संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी केली.

संगमनेर शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी, वाहने चोरी जाणे अशा अनेक घटना घडत असताना, त्यातील बहुतेक प्रकरणांचा तपास अधांतरीच राहिला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. या घटनेतही चार आरोपींनी अंधाराचा फायदा घेत थेट पोलिसांच्या डोळ्यादेखत पळ काढला. ही बाब अत्यंत चिंताजनक असून, पोलिसांची उपस्थिती असूनही दरोडेखोर पसार होतात, यावरून पोलिस यंत्रणेचा गतीहीनपणा उघड होतो. महामार्गालगत आणि बोगद्याजवळ अशा प्रकारे दरोडेखोरांची वावर असणे हे केवळ पोलिसांसाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही गंभीर इशारा आहे. वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची दुर्लक्ष वृत्ती यामुळे शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here