
घुलेवाडीतील विकास कामांचे श्रेय लाटू नका – माजी मंत्री थोरात
घुलेवाडी कोणाची जहागीरदारी नाही – आ. खताळ

संगमनेर (दैनिक युवावार्ता)- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीच्या विकासासाठी सव्वा दोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल खताळ यांनी विकासकामांच्या दर्जाबाबत ठेकेदारांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. “कामांचा दर्जा उत्तम असेल तरच या तालुक्यात तुम्हाला कामे मिळतील, अन्यथा इतरत्र जावे लागेल,” असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांनाही कामाच्या गुणवत्तेबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले. आ. खताळ म्हणाले की घुलेवाडी ही जहागीरदारी आहे असे काही जण समजत होते. त्यांनी कधीच वंचित समाज बांधवांच्या भागाचा विकास केला नाही. निवडणुका आल्या की मगच त्यांना विकास दिसतो इतरवेळी ते या समाज बांधवांचा फक्त निवडणुकी पुरता वापर करत असतात. दादागिरीला भीक घालू नका मी तुमच्या पाठीमागे भक्कम उभा आहे असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की या तालुक्यातील दहशत व दादागिरी आपण मोडून काढत त्यांचा बंदोबस्त केला आहे. जर घुलेवाडीतील काही बगलबच्चे तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही सर्वांनी साथ दिली तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त करू. या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ न देता विकास कामांच्या माध्यमा तून घुलेवाडी नव्हे तर संपूर्ण मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडले जातील.
मात्र या भूमिपूजन कार्यक्रमानंतर राजकीय वातावरण तापले. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी हे सर्व विकासकामे 2024-25 या आर्थिक वर्षात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचा दावा करत, सध्याच्या लोकप्रतिनिधींनी जुन्या निधीचे उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी पत्रक प्रसिद्ध करून स्पष्ट केले की, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांनी 1 ऑक्टोबर 2024 रोजी या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. पेव्हिंग ब्लॉक, काँक्रिट रस्ते, गटारे, वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेल्या कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री थोरात यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झाला होता. मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी एक रुपयाचा नवीन निधी न आणता जुन्याच कामांचे उद्घाटन केले आहे. खरे तर नव्याने निधी आणून विकास कामे करायला हवी आहेत. मात्र नवीन लोकप्रतिनिधी हे फक्त काही लोकांना हाताशी धरून जाहिरात बाजी करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे.
या पार्श्वभूमीवर सध्याचे आमदार आणि माजी मंत्री यांच्यात घुलेवाडीतील विकासकामांवरून श्रेयवाद निर्माण झाला आहे. एकीकडे आमदार खताळ हे विकासाचे नेतृत्व करत असल्याचे प्रतिपादन करीत आहेत, तर दुसरीकडे थोरात समर्थक हे कामे मंजूर करून ठेवलेली असल्याचा ठाम दावा करत आहेत. त्यामुळे विकासाच्या कामांपेक्षा त्याचे श्रेय कोणाचे, या मुद्द्यावरच राजकीय संघर्ष उभा राहताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या मते, विकास हे प्राथमिक ध्येय असावे, मात्र त्याचा वापर राजकीय प्रसिद्धीसाठी केला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.