पठार भागात शोककळा पसरली, घटनेचा तपस सुरू

संगमनेर तालुक्यातील साकूरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना अनंत चतुर्दशीच्या दिवशीच घडल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. साकूर शिवारातील बनवस्ती येथील सख्ख्या चुलत बहीणींनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कु. तन्वी अजित सगळगिळे ( वय १७) व मानसी राजेंद्र सगळगिळे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या तरूणींची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण पठार भागात खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, साकूर शिवारातील बनवस्ती येथे सगळेगिळे कुटुंब राहत आहे. सगळगिळे कुटुंबातील सदस्य शनिवारी शेतात कामाला गेले होते. तसेच तन्वी अजित सगळगिळे व मानसी राजेंद्र सगळगिळे या दोघी घरीच होत्या. दुपारी चारनंतर तन्वी ने एका घरात व मानसीने दुसऱ्या घरात गळफास घेतल्याचे समोर आले. यात मानसी इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. मानसीने गळफास घेतल्याची माहिती समजताच आसपासच्या काही व्यक्तींनी तीला तातडीने साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलिस उपनिरीक्षक बांधले, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर रूग्णवाहिकेला पाचारण करून दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथे पाठविण्यात आले. तन्वी आणि मानसीने एकाच वेळी असे टोकाच पाऊल का उचलले? अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. मात्र दोघीही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही घटना घडल्याने पठार भागात शोककळा पसरली आहे. या बाबत अधिक तपास घारगाव पोलिस करीत आहेत.