कवी अनंत फंदी नाट्यगृहास अभिनेते प्रशांत दामले यांची आ. तांबे यांच्या समवेत भेट

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर हे मोठी समृद्ध परंपरा असलेले शहर आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कायम हा समृद्ध परंपरेचा वारसा जपला असून संत व कलावंतांचा सन्मान केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात अद्यावत असे कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह उभे राहिले आहे. संगमनेर तालुक्यात नाटकाचे प्रयोग व्हावे ही अनेक दिवसांची इच्छा होती. कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे काम आता प्रगतीपथावर असून येथे लवकरच आम्हाला नाटक करण्याची संधी मिळेल असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी कलावंत प्रशांत दामले यांनी केले आहे.
ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतीच कवी अनंत फंदी नाट्यगृहास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी समवेत आमदार सत्यजित तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, नितीन अभंग, मुख्याधिकारी दयानंद गोरे, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे, नाट्य परिषदेचे प्रा डॉ संजय दळवी, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, विशाल कदम ,मोहसीन शेख डॉ, सुनील चव्हाण, डॉ. रवींद्र गायकवाड, अंतुन घोडके, गणेश राजदेव यांस विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांनी संपूर्ण नाट्यगृहाची पाहणी करून अद्यावत सुविधांसाठी विविध सूचना केल्या. याप्रसंगी बोलताना अभिनेते प्रशांत दामले म्हणाले की, संगमनेर हे राज्यातील प्रगत आणि आर्थिक समृद्धता असलेले संस्कृत शहर आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम कलावंतांना प्रोत्साहन दिले आहे. संगमनेर तालुक्यात आपल्या नाटकाचे प्रयोग व्हावे ही अनेक दिवसांची इच्छा आहे. कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे काम आता अंतिम टप्प्यात असून या नाट्यगृहात लवकरच नाटकांचे प्रयोग करता येणार आहे. पुढील काही महिन्यात हे नाट्यगृह कलावंत व प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे. नाट्यगृहांची स्वच्छता, पवित्रता व त्यांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी आहे. सार्वजनिक मालमत्ता या आपल्या मानून त्याचे जतन संवर्धन केले पाहिजे. केवळ शासनावर जबाबदारी ढकलून नका. महाराष्ट्रात सध्या 46 नाट्यगृह कार्यरत असून सरकारने पायलट प्रोजेक्ट हातात घेऊन त्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. संगमनेर नगर परिषदेने उन्हाळ्यात सुट्टीच्या काळामध्ये या नाट्यगृहात नाट्यवाचन चळवळ सुरू करावी म्हणजे त्यातून नवीन कलाकार मिळतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आ. सत्यजित तांबे हे लढवय्ये नेतृत्व आहे. त्यांनी मराठी नाटकांसाठी राज्यात पुढील कालावधीत जास्तीत जास्त नाट्यगृहांची संख्या कशी वाढवता येईल असा आग्रह सरकारकडे धरावा. जेणेकरून मराठी कलावंत व त्यांची कला संपुष्टात येण्यापासून वाचेल. उदयनमुख कलाकारांनी जे आपल्याला जे येते त्यामध्ये प्राधान्य मिळवावे. जे येत नाही ते करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या जे गुण कौशल्य आहे ते चांगल्या सादरीकरणाकरतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील याची काळजी घ्यावी.





















