
गीता परिवार संगमनेरकडून गौरव; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सन्मान
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी भागवत संप्रदायाची स्थापना करुन वारकरी परंपरेचा पाया रचला. तेव्हापासून आजतागायत हजारो वारकरी दरवर्षी ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करीत पंढरीची वाट धरतात. मात्र याच परंपरेतील नीलेश महाराज झरेगांवकर या वारकर्याने चक्क कैद्यांमध्येच संतांचा शोध घेत कारागृहाची वारी सुरु केली. गेल्या दोन वर्षात त्यांनी महाराष्ट्रातील 75 टक्के कारागृहांमध्ये जावून गुन्हा केलेल्या 94 हजार हातांमधून टाळ-मृदूंगाचे स्वर उमटवले. शिक्षा झालेला कैदी सुटका झाल्यावर सन्मार्गावर यावा यासाठीचे त्यांचे हे कार्य भगवद्कार्याचा शिखरच. या असामान्य कार्याची दखल घेत गीता परिवाराने अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार’ देवून त्यांचा गौरव केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गीता परिवाराचे संस्थापक, श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ईसरूळ, जि. बुलढाणा येथे हा सोहळा पार पडला.
संस्कार क्षेत्रात कार्यरत असलेल्या गीता परिवाराला श्रीमद् भगवद्गीतेचा प्रचार-प्रसार करणारी वैश्विक संस्था म्हणून ओळखले जाते. भगवद्शक्ती भगवद्गीता, भारत माता आणि विज्ञान दृष्टी या तत्त्वांचा सार असलेले स्वामी विवेकानंद यांचे तत्त्व स्वीकारुन गीता परिवाराकडून राष्ट्र निर्माणाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणार्या सेवाव्रतींना त्यांच्या नावाने दिला जाणारा हा राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. गौरवपत्र, सन्मानचिन्ह व एक लक्ष रुपयांची सन्मान राशी असे स्वरुप असलेला हा पुरस्कार यंदा वारकरी संप्रदायाचे भोयी, वारकरी परिषदेचे मुख्य प्रर्वतक ह.भ.प.नीलेश महाराज झरेगांवकर यांना प्रदान करण्यात आला.
तुरुंग, कारागृह अथवा जेल हे शब्द नुसते कानावर जरी पडलेत तरी मनात धडकी भरते. मात्र झरेगांवकर महाराजांनी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या 60 कारागृहांमध्ये जावून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 47 हजार कैद्यांना कीर्तनातून भगवद्भक्तिचा मार्ग दाखवून सन्मार्गाची दिशा दाखवण्याचे अलौकीक कार्य केले आहे. ज्या हातांनी कोणतातरी अपराध केला, अशा 94 हजार हातांमध्ये टाळ आणि मृदूंग देवून त्यांनी या कैद्यांना समाजाच्या प्रवाहात येण्याची प्रेरणा दिली. प्रदीर्घकाळ कारागृहात राहिलेल्या बंदीवानाकडे समाज कुत्सित नजरेने बघतो. त्यातून शिक्षा भोगून आलेले कैदी गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी झरेगांवकर महाराज यांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले असून देशभरातील दीड हजार कारागृहांमधील कैद्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गीता परिवाराच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना भविष्यातील उपक्रमांमध्ये सरकारचा सहभाग देण्याचा मनोदय व्यक्त केला. देशाचा विचार असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार समाजासाठी कार्यरत असलेल्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. नीलेश महाराज झरेगांवकर यांनी समाज प्रबोधन म्हणून कीर्तन करावे यासाठी नव्हेतर 47 हजार कैद्यांना पांडूरंगाच्या नामस्मरणातून समाजाच्या प्रवाहात आणण्याचे अवघड काम केले आहे. कारागृह हे सुधारगृह व्हावे यासाठीच्या त्यांच्या अविरत प्रयत्नांना गीता परिवाराचा राष्ट्रीय पुरस्कार बळ देणारा ठरेल असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी गीता परिवाराच्या कार्याचा धावतापट मांडला. यावेळी त्यांनी विविध उपक्रमांचा उल्लेख करताना कोविडकाळात गीता परिवाराने वैश्विक पातळीवर सुरु केलेल्या श्रीमद् भगवद्गीतेच्या प्रचार-प्रसार मोहीमेची माहितीही दिली. गीता परिवाराचे सचिव श्रीकांत कासट यांनी आभार मानले. या सोहळ्याला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह वारकरी संप्रदायातील महानुभाव आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.