हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी – संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेची मागणी

संगमनेर: त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणारया गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा संपादक व पत्रकार संघ, दैनिक युवावार्ता तसेच सर्व पत्रकार संघटना आणि डिजिटल मिडियाच्या तीव्र शब्दात धिक्कार करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई चे अध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी केली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे साधू महंताची कुंभ मेळयाच्या संदर्भात बैठक होती त्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर गेले होते. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश शुल्क भरावे लागते. मात्र आम्ही पत्रकार आहोत आणि बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहोत असे वारंवार सांगूनही टोलवरील कर्मचारी ऐकायला तयार नव्हते. पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असतानाच वसुली करणाऱ्या गुंडांनी पत्रकारांना मारहाण करायला सुरूवात केली. यामध्ये झी – 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनवणे आणि अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून एका पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथील रूग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी अपोलो हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या जखमी पत्रकारांची रुग्णालयात जाऊन भेट घेत सदर गुंडांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांवर हल्ला करणारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी पुर्वानुभ बघता काही कारवाई होण्याची शक्यता नसल्याने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून हल्लेखोरांना अद्दल घडेल अशी कारवाई करावी अशी मागणी देखील किसन भाऊ हासे यांनी केली आहे. हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा देखील हासे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला.. मात्र सात वर्षे झाली तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत.. पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचे नोटिफिकेशन काढून सरकारने तातडीने महाराष्ट्रात हा कायदा लागू करावा अशी मागणीही देखील करण्यात आली आहे.