
उकाड्याने नागरिक त्रस्त, महावितरण वसुलीत व्यस्त
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात वीजेचा लपंडाव सुरू आहे. आधीच मे च्या उकाड्याने नागरिक त्रस्त असताना दिवसभर या वीजेचा चालू बंदचा खेळ सुरू आहे. वीजेच्या या खेळखंडोब्यामुळे व्यापारी, उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसत असताना व नागरिक हैराण झाले असताना महावितरण मात्र वसुलीत व्यस्त असल्याचे विदारक चित्र संगमनेरात दिसत आहे.

सध्या उन्हाळ्याचा कडक असा मे महिना सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. कधी वीज गायब होईल व कधी पुन्हा येईल याचा कोणताही थांगपत्ता लागत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने वीजेवर चालणारे उपकरणे बंद पडत असल्याने त्याचा मोठा फटका व्यापारी उद्योजकांना बसत आहे. घरगुती ग्राहकांची ही वीज वारंवार खंडीत होत असून घरातील माणसे उकाड्याने हैराण झाले आहे. महावितरणने वसुलीसाठी काही दिवसांपासून ज्या प्रमाणात तगादा लावला आहे. त्या प्रमाणात सेवा देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
वापरापेक्षा ज्यादा बीले देऊन एकीकडे ग्राहकांची लुटमार केली जात असतांना दुसरीकडे आता ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठ्यात सातत्या राखण्यात महावितरण कमी पडत आहे. वारंवार होणार्या या वीज पुरवठा खंडीत प्रकरणी महावितरणकडून कोणतीही दक्षता किंवा उपाय योजना केली जात नाही. महावितरणचा तक्रार क्रमांक सातत्याने बंद किंवा व्यस्थ लागत असतो. तक्रार करूनही त्याची वेळेत नोंद घेतली जात नाही. सरकार बदलले मात्र महावितरणचा मुजोरीपणा कधीच बदलत नाही.
बोगस रिडींग, अवस्थव बिले, बिले कमी न करणे, भरलेले बिले लागून येणे, वीज जोडणीसाठी अतिरिक्त पैसे घेणे, खराब मीटर देणे, रेडिंग न घेता बीले देणे यासारख्या तक्रारी वारंवार महावितरणकडे केल्या जातात. आता मात्र ऐन उन्हाळ्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. एकीकडे राज्यात पाणी व कोळसा मुबलक प्रमाणात असल्याचे शासन सांगत असतांना व वीज निर्मीतीत सध्या कोणताही मोठा बिघाड झालेला नसतांना संगमनेरात मात्र वीज पुरवठा सातत्याने का खंडीत होतो हे न उलगडणारे कोडे आहे. वीज पुरवठा का खंडीत होतो, गेलेली वीज पुन्हा कधी येईल याचे कोणतेही समर्पक उत्तर देणारी यंत्रणा महावितरणकडे नाही. त्यामुळे नागरीक नाईलाजस्तव गेलेल्या वीजेची वाट पाहत उकडा सहन करत बसतात. दरम्यान महावितरणचा हा खेळ खंडोबा लवकर न थांबल्यास संगमनेरकरांना महावितरणविरूद्ध रस्त्यावर उतरावे लागणार आहे.